माऊलींच्या प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्णय
आळंदी (वार्ताहर) –संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळा 2021 आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र आळंदी शहर आणि आसपासच्या परिसरातील गावात 28 जून ते 04 जुलैपर्यंत संचारबंदी घोषित करण्यात आली आहे.
तीर्थक्षेत्र आळंदी आणि परिसरामध्ये आषाढी वारीनिमित्त महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येत असतात. त्यामुळे भाविक एकत्र येऊन गर्दी होण्याची व करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वतीने हा संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.
संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुकांचे प्रस्थान 2 जुलै रोजी 100 वारकऱ्यांच्या उपस्थित होणार आहे. प्रस्थान होऊन माऊलींच्या चलपादुका 18 जुलैपर्यंत दर्शन मंडपात असतील. 19 जुलैला पंढरपूरकडे एसटी महामंडळाच्या दोन बसने मार्गस्थ होणार आहेत.
या कालावधीमध्ये आळंदीमधील सर्व प्रकारची सार्वजनिक व खासगी वाहतूक बंद राहणार आहे. आळंदी परिसरातील अत्यावश्यक वाहने तसेच स्थानिक नागरिकांना आपले ओळखपत्र दाखवून प्रवेश दिला जाणार आहे. .
या गावांमध्ये संचारबंदी
सोमवारपासून (दि. 28) आळंदीसह चऱ्होली खुर्द, केळगाव, डुडुळगाव, चिंबळी, वडगाव-घेनंद, कोयाळी, धानोरे, सोळू, मरकळ, चऱ्होली बुद्रुक, चोविसावाडी अशा 11 गावांत 4 जुलैपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.