पर्यटन संचालनालयाचा राज्य शासनाकडे प्रस्ताव
गणेश आंग्रे
पुणे – पावलोपावली इतिहासाच्या पाऊलखुणा आढळणाऱ्या आणि निसर्गाने सौदर्यांची मुक्तहस्त उधळण केलेल्या पुरंदर आणि मावळ या तालुक्यांना “पर्यटन तालुके’ म्हणून मान्यता मिळण्याची शक्यता आहे. यासाठी पर्यटन संचालनालयाने राज्य सरकारकडे प्रस्ताव सादर केला आहे. त्यामुळे आजपर्यंत दुर्लक्षित राहिलेल्या या तालुक्यांना विकासाची पाऊलवाट
मिळणार आहे.
राज्यातील पहिला पर्यटन तालुका म्हणून यापूर्वीच जुन्नरला मान मिळालेला आहे, तर आता मावळ आणि पुरंदर हे “पर्यटन तालुके’ जाहीर झाल्यानंतर या दोन्ही तालुक्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे, अशी माहिती पर्यटन संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
मावळ तालुका निसर्गसंपदेने नटलेला आहे. किल्ले, लेणी, थंड हवेचे ठिकाण, धरणे आदी घटकांनी समृद्ध असा हा तालुका आहे. प्रवासाच्या दृष्टीने पुण्यासह, मुंबईकरांसाठी मावळ तालुका सोयीचा आहे. द्रुतगती महामार्गामुळे पर्यटकांना जाणे-येणे सोयीचे ठरते. दर शनिवार -रविवारी या तालुक्यात पर्यटकांची मोठी गर्दी असते.
कला संस्कृती व पारंपरिक वारसा लाभलेला पुरंदर तालुका आहे. पुरंदर तालुक्यामध्ये पुरंदर किल्ला, महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरी आदी महत्त्वाची ठिकाणे आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर या दोन्ही तालुक्यांत पर्यटन क्षेत्र म्हणून जाहीर झाले, तर पर्यटन क्षेत्र विकासाबरोबरच तालुक्यांत कायमस्वरुपी रोजगार निर्माण होण्यास मदत होणार आहे.
मावळातील पर्यटनस्थळे
लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, राजमाची किल्ला, तुंग किल्ला, तिकोणा किल्ला, कोराईगड किल्ला, कामशेत, लोणावळा, खंडाळा, कार्ले लेणी, भाजे लेणी, एकवीरा देवी मंदिर, भुशी डॅम, राजमाची पॉइंट, कातळधर धबधबा, प्रतिशिर्डी शिरगाव, अजिवली देवराई.
पुरंदरमधील पर्यटनस्थळे
पुरंदर किल्ला, जेजुरी, कडेपठार, भुलेश्वर मंदिर, नारायणपूर मंदिर, केतकावळे-प्रतिबालाजी मंदिर.