जालना : लोकसभा निवडणुकीपूर्वी एकमेकांसमोर आव्हान उभं करणारे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर हे आता पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. त्यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी करून समेट घडवून आणली होती. आता पुन्हा एकदा दानवे-खोतकर एकमेकांसमोर उभे ठाकले आहे.
जाफ्राबादमधील भाजप कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतल्याने केंद्रीय राज्य मंत्री रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरून पाच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आलं होतं. आज त्या पोलिसांचे निलंबन मागे घेण्यात आलं आहे. पोलिसांवरील ही कारवाई मागे घेतल्याने दानवे-खोतकर वाद पुन्हा उफाळून आला आहे.
एका पत्रकारला 11 जून रोजी मारहाण करणाऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस भाजप कार्यालयात गेली. ज्यामुळे केंद्रीय मंत्र्यांचा पारा चढला. दानवे यांनी पोलिसांनी बेकायदेशीर कृत्य करून कार्यालयातील विकास कामांचा डेटा सोबत घेऊन गेल्याची तक्रार पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांच्याकडे केली. त्यानंतर अधीक्षकांनी 2 पीएसआयसह 5 पोलीस कर्मचऱ्यांचं निलंबन केलं. यामुळे जिल्ह्यात दानवे यांचा दबदबा असल्याचे दिसून आलं होतं.
दरम्यान खोतकर यांनी थेट गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेऊन पोलीस कर्मचाऱ्यांचे निलंबन चुकीचे असल्याचे दाखवत ते मागे घेण्याची विनंती केली. त्यानंतर निलंबनाची कारवाई मागे घेण्यात आली. मात्र या घटनेमुळे दानवे-खोतकर यांच्यातील राजकीय वैर पुन्हा अधोरेखित झालं आहे.