Raosaheb Danve on Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी जाहीर केलेले उमेदवार बदलले आहेत. त्यावरून राज्यात आता मुख्यमंत्री शिंदेवर भाजपचा दबाव असल्याची चर्चा सुरु आहे. यावरून भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी भाष्य केले आहे. (Lok Sabha Election 2024)
जालना येथे बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले, निवडून येणे हेच आमचं पहिलं सूत्र आहे. त्यामुळे उमेदवार बदलण्यासाठी भाजपचं प्रेशर आहे, असं म्हणता येत नाही. उमेदवारांनी स्वतःहून माझ्या ऐवजी इतरांना उमेदवारी द्या, अशी मागणी केली. त्यामुळे निर्णय घेण्यात आला. उमेदवारी बदल हा त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. त्यांचा अंतर्गत विषय भाजपशी संबंध नाही. उमेदवार बदलासाठी काही वेळा सर्व्हे असतात, काही वेळा कार्यकर्त्यांचं जनतेचं मत असतं, कधी कधी स्वतः होऊन उमेदवार निवडणूक लढण्यास नकार देतात. तसेच यावेळी राज्यात भाजप 45, तर देशात 400 पार जाणार, असा दावाही रावसाहेब दानवे यांनी केला.
हिंगोलीचा उमेदवार बदलला –
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल बुधवारी हिंगोली लोकसभा मतदारसंघासाठी जाहीर केलेले उमेदवार हेमंत पाटील यांचे तिकीट रद्द करुन त्यांच्या जागी बाबुराव कदम कोहळीकर यांना उमेदवारी जाहीर केली. या घडामोडीनंतर राजकीय वर्तुळात शिंदे यांच्यावर भाजपचा दबाव असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. एकनाथ शिंदे यांची भाजपकडून कोंडी करण्यात येत आहे, अशा चर्चा रंगू लागल्या आहेत.