Jalna Lok Sabha| भाजपने काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची नावे जाहीर केली होती. यात जालन्यातून केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. रावसाहेब दानवे सहाव्यांदा ही निवडणूक लढवणार आहे. त्यापूर्वी आमदार तथा काँग्रेसचे नेते कल्याण काळे यांना महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कल्याण काळे यांना पुन्हा संधी
काँग्रेसने महाराष्ट्रातील लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. मात्र, या यादीत कल्याण काळे यांचे नाव नाही. तरी देखील या जागेवर कल्याण काळे यांनाच उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे 2009 मध्ये देखील कल्याण काळे यांनी दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवली होती मात्र त्यांचा पराभव झाला होता.
यात रावसाहेब दानवे यांना 3 लाख 50 हजार 710 मतदान झाले होते. तर, कल्याण काळे यांना 3 लाख 42 हजार 228 मतदान झाले होते. त्यामुळे 8 हजार 482 मतांनी काळे यांचा पराभव झाला होता. तर मागील लोकसभा निवडणुकीचा रावसाहेब दानवे यांच्याविरोधात काँग्रेसचे विलास औताडे रिंगणात होते. त्यावेळी दानवे यांचा 3 लाख 32 हजार 815 मतांनी विजय मिळाला होता.
कल्याण काळे यांच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही उमेदवाराने दानवे यांना कडवी झुंज दिलेली नव्हती. त्यामुळे दानवे यांचा पराभव करायचा असेल, तर कल्याण काळे यांना उमेदवारी द्या, अशी मागणी काँग्रेस पदाधिकारी करीत आहेत.
सलग सातवेळा जालना मतदार संघ भाजपच्या ताब्यात
जालना मतदार संघ1996 पासून जालना लोकसभा मतदारसंघ 2019 पर्यंत सलग सातवेळा भाजपच्या ताब्यात राहिला आहे. 1996 ते 1999 पर्यंत उत्तमसिंह पवार दोनदा भाजपच्या तिकीटावर जालन्यातून खासदार झाले. तर, 1999 पासून आतापर्यंत पाच वेळा रावसाहेब दानवे सलग भाजपकडून निवडून आले आहेत.
हेही वाचा:
Pune: पीएमपी सेवानिवृत्त सेवकांचा प्रश्न आचारसंहितेनंतर सोडविण्यात येणार