नवी दिल्ली – केंद्र सरकारने देशातील अनेक राज्यांना लसीच्या बाबतीत वाऱ्यावर सोडल्याचा आरोप करून 18 ते 44 वयाच्या नागरिकांचे लसीकरण गेल्या चार दिवसांपासून बंद आहे. ही एकट्या दिल्लीचीच नव्हे, तर देशातील परिस्थिती आहे. नवीन लसीकरण केंद्रे सुरु करण्यापेक्षा जी आहेत तिच आम्हाला बंद करावी लागत असल्याची टीका केंद्र सरकारवर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केली.
जगभरातील कंपन्या राज्यांना करोना लस पुरविण्यास तयार नाहीत. याबाबत केंद्राने हात वर केले असून करोना प्रतिबंधक लस केंद्र का खरेदी करत नाही? आणि आपण लसींची खरेदी राज्यांवर सोडू शकत नाही.
सध्या कोरोनाविरोधात आपला देश युद्ध लढत आहे. पाकिस्तानने जर आपल्या देशावर हल्ला केला, तर याची जबाबदारी तुम्ही राज्यांवर सोडणार आहात का? स्वत:चे रणगाडे उत्तर प्रदेश खरेदी करणार आहे का? की स्वत:ची हत्यारे दिल्ली खरेदी करणार आहे? असा सवाल केजरीवालांनी मोदी सरकारला केला आहे.
माझ्या माहितीप्रमाणे लसीचा एक डोसदेखील देशातील कोणतेच राज्य खरेदी करू शकलेले नाही. राज्यांसोबत बोलण्यासही लसी बनविणाऱ्या कंपन्यांनी नकार दिला आहे. ही वेळ केंद्र आणि राज्य सरकरांनी एकत्र येऊन लढण्याची आहे.
आपण वेगवेगळे काम करू शकत नाही. आपल्याला टीम इंडियासारखे काम करावे लागणार आहे. लोकांना लसी पुरविणे ही केंद्राची जबाबदारी आहे, राज्यांची नाही. जर आणखी उशिर झाला, तर माहित नाही आणखी किती जीव गमवावे लागतील, असा इशारा देखील केजरीवालांनी दिला आहे.
दिल्लीला स्पुटनिक देण्याची तयारी
दरम्यान, दिल्लीला लस पुरवठा करण्याची तयारी स्पुटनिक लस तयार करणाऱ्या रशियाच्या कंपनीने दर्शवली आहे. मात्र किती लसी ते देणार त्याचे प्रमाण अद्याप ठरले नसल्याची माहितीही केजरीवाल यांनी आज दिली.
दिल्लीत म्युकर मायकोसिसची 620 प्रकरणे आढळून आली आहेत. मात्र त्याच्याही इंजेक्शनचा तुटवडा असल्याचे ते म्हणाले. स्पुटनिकच्या संदर्भात आमचे अधिकारी कंपनीच्या लोकांना मंगळवारीही भेटले होते. त्यांनी लस देण्याची तयारी दर्शवली असून लवकरच काहीतरी निर्णय होईल असे केजरिवाल यांनी नमूद केले.