पुणे – लग्न समारंभासाठी 50 लोकांच्या उपस्थितीत करण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी ग्रामीण भागात होणाऱ्या लग्नसमारंभास गर्दी होत आहे. लग्न समारभांसाठी 200 ते 500 पेक्षा जास्त लोक उपस्थित राहत असल्याचे निदर्शनास आले आहे. यापार्श्वभूमीवर आता जिल्हा प्रशासनाने अधिक कडक नियम केले आहे. यामध्ये लग्न समारंभास उपस्थित असणाऱ्या व्यक्तीने लसीकरण केलेले असावे, अथवा संबधित व्यक्तीने कोविड -19 (आरटी-पीसीआर) निगेटिव्ह दाखला बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नियमांचे पालन न करणाऱ्या व्यक्तींकडून प्रत्येकी हजार रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.
लग्न समारंभासाठी सूचना देऊनही उपस्थित राहण्याच्या मर्यादेकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच नियमांचे उल्लंघन झाल्यास यापूर्वी फक्त कार्यालयांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. आताही कार्यालयांनी नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यांकडून दहा हजार रुपयांचा दंड आकाराला जाणार आहे. तसेच वारंवार नियमांचा भंग झाल्यास सदर कार्यालयाचा परवाना रद्द केला जाण्याचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे.
गावनिहाय पथके स्थापन
प्रामुख्याने लग्न समारंभात मर्यादेपेक्षा जास्त गर्दी करणाऱ्यांवर आता जिल्हा प्रशासनाकडून लक्ष ठेवले जाणार आहे. त्यासाठी गावनिहाय पथके स्थापन केली असून यामध्ये ग्रामसेवक, तलाठी आणि पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ही पथके लग्न कार्यालये, हॉल, रिसॉर्ट या ठिकाणी होणाऱ्या लग्न समारंभाला भेट देणार आहे. या ठिकाणी नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करणार आहे.