मुंबई : मागील वर्षभरापासून वीज बिलाचा मुद्दा चांगलाच वादात अडकला आहे. त्यातच आता थेट राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील जनतेला अतिशय महत्त्वाचे आवाहन केले आहे.
वीज वापराचे मीटर रिडींग मोबाईल अॅपद्वारे घ्या आणि वीजबिल भरा असे आवाहन उर्जामंत्री नितीन राऊत यांनी राज्यातील नागरिकांना केले आहे. एका वृत्त वाहिनीशी बोलताना राऊत यांनी नागरिकच आमचा राजा आहे, म्हणत त्यांना हे आवाहन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या ‘ब्रेक दि चेन’च्या निर्बंधांमुळे वीज कर्मचाऱ्यांना ग्राहकांच्या वीज वापराचे प्रत्यक्ष रिडींग घेण्यावर निर्बंध येणार आहेत, याच पार्श्वभूमीवर नितीन राऊत यांनी हे आवाहन नितीन राऊत यांनी केले आहे. तसेच महावितरणनेही वीज ग्राहकांच्या तक्रारी तातडीने सोडवाव्यात, त्यांना कोणतीही गैरसोय होऊ नये याची काळजी घ्यावी यासाठीची विशेष खबरदारी घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडवण्यासाठी ग्राहक निवारण यंत्रणेला अलर्ट राहण्याचे निर्देशही राऊत यांनी दिले आहेत. मागील लॉकडाऊन काळात जे घडलं ते अत्यंत दुर्दैवी चित्र होतं. ज्यामध्ये अनेक ग्राहकांना त्रास झाला. अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडू नये आणि ग्राहकांना त्रास होऊ नये, कारण ग्राहक हा आमचा राजा आहे, आमचं दैवत आहे. त्यामुळं ग्राहकांचं हित जोपासणाऱ्या गोष्टींसाठी हातभार लावण माझं काम आहे, असे नितीन राऊत म्हणाले.
स्वत:च मीटर रिडींग घेऊन ग्राहकांनी ते संबंधित विभागांना पाठवावं, शिवाय ज्यांची घरं बंद असतील त्यांनी सर्व स्वीच बंद करुनच घराबाहेर पडावं. त्यावेळी बंद केल्यानंतरच्या रिडींगची उर्जा विभागाला माहिती द्यावी, जेणेकरुन पुढं सरासरी आकडेवारी काढण्याची आवश्यकता राहणार नसल्याची माहिती त्यांनी दिली. ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीनं ही यंत्रणा कार्यरत असणार आहे, असं म्हणत नितीन राऊत यांनी जनतेने आपल्याला सहकार्य करावे असे आवाहन केले.