संयुक्तराष्ट्रे, दि. 26 – पॅलेस्टाईन आणि इस्त्रायल यांच्यात थेट चर्चेला उत्तेजन देऊन तिथे कायम स्वरूपी शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे असे प्रतिपादन भारताने आज संयुक्तराष्ट्रांत केले आहे. इस्त्रायल मध्ये नुकत्याच निवडणूका झाल्या आहेत आणि पॅलेस्टाईन मध्ये लवकरच निवडणुका होऊ घातल्या आहेत. या वातावरणात दोन्ही देशांमध्ये थेट चर्चा झाली तर त्यांच्यातील वादावर पडदा पडण्यास आणि त्या परिसरात शांतता प्रस्थापित करण्यास मदत होईल असे भारताने म्हटले आहे.
दोन्ही देशांमध्ये जो सीमावाद आहे त्यावरून दोन्ही देशांमध्ये गेली अनेक दशके संघर्ष सुरू आहे. जेरूसलेमच्या नियंत्रणावरूनही त्यांच्यात वाद आहेत. त्यावर कायम स्वरूपी तोडगा काढण्यासाठी दोन्ही राष्ट्रांना आपसात थेट चर्चा करण्यास प्रोत्साहन दिले गेले पाहिजे अशी भारताची पहिल्यापासूची भूमिका आहे. त्याच भुमिकेचा पुनरूच्चार आज भारताचे संयुक्तराष्ट्रांतील कायम प्रतिनिधी टी.एस. तिरूमुर्ती यांनी केला. ते म्हणाले की दोन्ही देशांमध्ये नवीन सरकार स्थापनेची प्रक्रिया सुरू आहे.
या टप्प्याचा चांगला वापर करून त्यांच्यात थेट चर्चा घडवून आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवरून प्रयत्न केले गेले पाहिजेत. तिरूमुर्ती आज संयुक्तराष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात मध्यपुर्वेतील स्थिती बाबत भारताची भूमिका मांडत होते. संयुक्तराष्ट्रांचे समन्वयक टोर वेन्सीलॅंड त्यावर म्हणाले की इस्त्रायलने पॅलेस्टाईनच्या हद्दीत अतिकम्रण करून त्यांची अधिक जागा व्यापल्याने दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेले आहेत. त्यामुळे इस्त्रायलने पॅलेस्टाईनच्या हद्दीत घुसून तेथे आपल्या वसाहती प्रस्थापित करण्याची भूमिका थांबवली पाहिजे अशी सुचनाही त्यांनी केली.