ढाका – पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० व्या वर्धापन दिन साजरा करण्यासाठी मोदी तिथे पोहचले आहेत. यावेळी त्यांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यांसाठी केलेल्या प्रयत्नांच्या आठवणींना उजाळा दिला.
ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना मोदी म्हणाले, बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या संघर्षात सहभागी होणे, माझ्या जीवनातील आंदोलनांपैकी एक महत्त्वाचं आंदोलन होतं. त्यावेळी माझे वय २०-२२ असेल, मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांनी त्यावेळी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. बांगलादेशच्या मुक्तीसंग्रामात सहभागी झालेल्या भारताच्या शूर सैनिकांना मी सॅल्यूट करतो. या कार्यक्रमास बांगलादेश मुक्तीसंग्रमात भाग घेतलेले अनेक भारतीय सैनिक आज उपस्थित असल्याचा आपल्याला आनंद असल्याचे मोदींनी म्हटलं.
यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केले. पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे त्यांनी हा पुरस्कार सपूर्द करून शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणींना उजाळा दिला.