मुंबई – धमक्या ही समाजातली एक मोठी समस्या आहे. धमक्यांचे प्रकार कुठेही घडू शकतात. शाळेत, महाविद्यालयात, घरी किंवा ऑनलाईन माध्यमांत.. कुठेही हा धोका असू शकतो. हे प्रकार ठरावीक कालांतराने पुन्हा-पुन्हा घडून येऊ शकतात आणि त्यामुळे व्यक्तीला मानसिक आणि शारीरिक दोन्ही पातळ्यांवर धोका किंवा दुखापत संभवू शकते. ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच, समाजमाध्यमांतून, ऑनलाईन खेळांतून, मोबाईल फोन्सच्या माध्यमातून घडणाऱ्या धमक्यांच्या घटनांना “सायबर बुलिंग’ किंवा “सायबर धमक्या’ असे म्हणतात. मात्र, अशा धमक्या मिळाल्या तरी न घाबरता सरळ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी, असे सायबर सेलतर्फे निवेदन देण्यात आले आहे.
सायबर धमक्यांना बळी पडलेले तरुण वेगवेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात. काही लोक या घटनांकडे दुर्लक्ष करतात तर काही फारच मनावर घेतात. अशा लोकांच्या बाबतीत स्वत:ला हानी पोहोचवून घेण्याचा धोका अधिक असून काही लोकांमध्ये अशा घटनांमुळे डिप्रेशन, राग, शैक्षणिक अपयश, मानसिक आघातांना बळी जाणे, असे प्रकार घडू शकतात. सायबर धमक्या आणि समक्ष धमक्या दोन्ही प्रकारांचा दीर्घकालीन मानसिक परिणाम होतो. याला बळी पडलेल्यांमध्ये पराकोटीचे नैराश्य येत असून काही वेळा स्वयंहिंसा किंवा आत्महत्यांचाही प्रयत्न केला जाऊ शकतो.
आजकाल धमक्यांच्या अनेक प्रकारांत सायबर धमक्या हा अत्यंत सामान्य प्रकार होत चालला असून यात एखाद्या व्यक्तीबाबत अफवा पसरवणे, चुकीचे काहीतरी पोस्ट करणे, बळी पडलेल्या व्यक्तीची लाजिरवाणी छायाचित्रे किंवा व्हीडिओ पसरवणे आदी प्रकारांचा समावेश असतो. ऑफलाईन किंवा प्रत्यक्ष धमक्यांचे हे व्यापक रूप असू शकते.
धमकी देणाऱ्याविरोधात लढण्यासाठी पुरावे गोळा करून त्याच्या विरुद्ध पोलिसांत तक्रार नोंदवणे अत्यावश्यक ठरते. ही क्रिया त्वरित पार पाडणे गरजेचे असते. पुरावे सादर करण्यासाठी स्क्रीनशॉट्स घेणे, ई-मेल सेव्ह करणे किंवा संवाद जतन करणे महत्त्वाचे असते. या सगळ्याच्या नोंदी ठेवल्याने तक्रार नोंदवण्यास मदत होते. स्वत:ला किंवा बळी पडलेल्या व्यक्तीला सायबर धमक्यांविरुद्धच्या कायद्यांची माहिती करून देणे उपयुक्त असते. धमकी देणाऱ्याशी वाद घालण्यापेक्षा त्याला ब्लॉक करणे केव्हाही फायद्याचे ठरते.
याबाबत पालकांनी पाळायच्या काही गोष्टींमध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, आपल्या पाल्याचे उगाच परीक्षण न करता त्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घ्यावे. त्यांच्या परिस्थितीप्रति सहानुभूती दर्शवावी आणि त्यांना नि:स्वार्थी सहाय्य पुरवावे. मुलांसोबत राहून याविरुद्ध लढल्याने मुलांना फारच मदत होते. सायबर धमक्यांमागचे कारण नेहमी आधी तपासून पाहणे गरजेचे असते.