नाशिक : अवकाळी पाऊस आणि त्यामुळे झालेल्या नुकसानीने शेतकरी त्रस्त आहेत. त्यात आता शेतकऱ्यांवर वीज बील भरण्यासाठी सक्ती करण्यात येत असून वीज कनेक्शन तोडण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यामुळे नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील शेतकरी संतप्त झाले असून या शेतकऱ्यांनी चक्क विधानसभा आमदारालाच ग्रामपंचायत कार्यालयात कोंडल्याचे समोर आले आहे.
महावितरणाकडून अन्यायकारक बिलं दिल्यानंतर, सक्तीची वसूली महावितरणाकडून होत आहे, याविरोधात शेतकऱ्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी आलेले बागलानचे भाजप आमदार दिलीप बोरसे यांना ग्राम पंचायतीत कोडलं. केरसाणे गावच्या ग्रामपंतायतीत ही घडना घडली.
अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांची पाहणी करण्यासाठी गेले असताना आमदार बोरसे यांना शेतकऱ्यांनी कार्यालयात बसवलं आणि त्यांच्यासोबत आत काही गावकरी ठेवले. तर उर्वरित शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतीचं दार बंद करून कार्यालयसमोर ठिय्या दिला. यंदा मालाला भाव मिळाला नसून अव्वाच्या सव्वा वीजबील दाखवून वसुली करण्यात येत आहे. महावितरणने तोडलेले वीज कनेक्शन ताबडतोब जोडून द्यावे, अन्यथा आमदार बोरसेंना सोडणार नसल्याचा पावित्रा शेतकऱ्यांनी घेतला होता. मात्र एक तासानंतर शेतकऱ्यांनी बोरसे यांची सुटका केली.