कत्तलीमुळे आफ्रिकेत नवा संघर्ष निर्माण होईल
नवी दिल्ली, ता. 23 – आज लोकसभेत पंतप्रधान पं. नेहरूंनी असे जाहीर केले की, दक्षिण आफ्रिकेतील केपटाउन शहराजवळ आफ्रिकन निदर्शकांवर गोळीबार करून त्यांची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली आहे. त्या घटनेची तुलना भारतातील इंग्रजशाहीतील जालियनवाला बाग कत्तलीशीच करता येईल. या कत्तलीमुळे ही घटना संपली असे नव्हे, तर नव्या संघर्षाला प्रारंभ होईल.
आफ्रिकन लोक या दडपशाहीमुळे दबणार नाहीत. आफ्रिकन लोकांवर ओढवलेल्या या प्रसंगात आशियाई लोकांचीच नव्हे, तर सबंध जगातील लोकांची, मग ते कोणत्याही देशांचे असोत, त्यांची सहानुभूती आफ्रिकनांच्या बाजूनेच राहील. आफ्रिकेतील घडामोडींवर लोकसभागृहात चर्चा करता येणार नाही हे मला समजते तथापि या घटनेमुळे इतिहासाला कलाटणी मिळेल.
टॅक्सीमध्ये 4 उतारू बसविण्याची मागणी
पुणे – पुणे शहरात चालू असलेल्या लहान टॅक्सीमध्ये सध्या तीन उतारू बसविण्याची परवानगी आहे. त्याऐवजी 4 उतारू बसविण्याची परवानगी असावी, तसेच सध्या या टॅक्सीचा दर मैलाचा दर 7 आणे आहे तो पहिल्या मैलाला 12 आणे व पुढे प्रत्येक मैलाला 8 आणे करावा अशी मागणी ऍटो-रिक्शा कॅब व टॅक्सी कॅब युनियनने आर. टी. ओ.कडे केली आहे. धंदा कमी आहे त्यामुळे हा बदल केला तर बेबी टॅक्सीवाल्यांचा फायदा होईल.
भ्रष्टाचार चौकशी मंडळ
नागपूर – सर्वोदयी नेते जयप्रकाश नारायण यांनी चिंतामणराव देशमुख यांच्या भ्रष्टाचार चौकशी मंडळ नेमण्याच्या मागणीला आपला पाठिंबा दिला आहे. जयप्रकाश म्हणाले, मी देशमुखांशी याबाबत बोललो आहे. त्यांनी सुचविलेल्या चौकशी मंडळाची सूचना लवकरच अंमलात आलेली बरी.