– हिमांशू
मुख्यमंत्री शनिवारी हाफकिन इन्स्टिट्यूटमध्ये गेले आणि त्या निमित्तानं का होईना टीव्हीवर करोना, लस वगैरे विषयांवर थोडा वेळ चर्चा झाली. हाफकिन इन्स्टिट्यूटची लसनिर्मितीची क्षमता उपयोगात आणली तर महाराष्ट्रात लशीचं अधिक उत्पादन होऊ शकेल आणि त्या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लशीच्या बाबतीत आपण खरोखर खूप भाग्यवान आहोत. आपल्याकडे ज्येष्ठ नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधीग्रस्तांना पहिला डोस दिला जातोय. सीरम आणि भारत बायोटेक या दोन्ही कंपन्यांची लस प्रभावी ठरलीय.
जगातले अनेक देश अजूनही लशीसाठी इतर देशांकडेच आशेनं पाहतायत. निर्मिती, उत्पादन, संशोधन, विज्ञान, तंत्रज्ञान या शब्दांशी जन्मापासून वाकडं असलेल्या पाकिस्तानमध्ये एकीकडे प्रचंड आर्थिक संकट आणि दुसरीकडे करोनाचा राक्षस उभा आहे. अनेक देशांनी ज्याला कर्ज देणंही बंद केलंय त्यांना आताच्या धामधुमीत करोनाची लस कोण देणार? करोनाचा प्रसार जिथून सुरू झाला, तो चीन मात्र पाकिस्तानचा सख्खा मित्र. चीनने सध्या 20 देशांमधून येणाऱ्या नागरिकांना चिनी लस घेणं बंधनकारक केलंय. त्यात भारताचाही समावेश आहे. असा हा पाकिस्तानचा मित्र अचानक उदार झाला आणि पाकिस्तानला पाच लाख लशी मोफत दिल्या. एकट्या महाराष्ट्राला जिथं 13 कोटी लशी एका टप्प्यात लागतात, तिथं पाकिस्तानला मिळालेल्या पाच लाख लशी कुणाला पुरणार हा प्रश्नच!
पण… पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मात्र चीनच्या मैत्रीची लस घेतलीच. दोनच दिवसांनी त्यांना त्रास सुरू झाला आणि तपासणी झाली. त्यात इम्रान करोनाग्रस्त असल्याचं स्पष्ट झालं आणि त्यांना आयसोलेशनमध्ये पाठवलं गेलं. म्हणजे, उण्यापुऱ्या पाच लाखातली एक लस वायाच गेली. पाकिस्तानात आजमितीस सुमारे सव्वासहा लाख लोक करोना पॉझिटिव्ह आहेत, असं सांगितलं जातंय. परंतु लसीकरणाचा वेग मात्र अत्यंत मंद आहे. आपल्याकडे त्याच्या कितीतरी अधिक वेगात लसीकरण सुरू असलं तरी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरचे नेते वेग आणखी वाढवायला सांगतायत.
अर्थात, आपल्या हातात पुरेसे डोस आहेत, तेही स्वदेशी! ज्यांच्याकडे डोसच नसतील, ते लसीकरणाचा वेग कसा वाढवणार? पाकिस्तानात सध्या रशियाची स्पुतनिक आणि चीनची सायनोफार्मा लस आपत्कालीन वापरासाठी उपलब्ध झालीय. पाकिस्तान सरकारने सत्तर टक्के लोकसंख्येचं लसीकरण करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं गेलंय. ब्रिटनने पाकिस्तानला काही डोस देण्याचं मान्य केलंय आणि ऍस्ट्राजेनेका कंपनीचेही काही डोस पाकिस्तानला मिळतील. परंतु अशा प्रकारे लसीची वाट पाहणं, इतरांवर अवलंबून असणं किती वाईट आहे, हे पाहिल्यास आपण किती सुखी आहोत याचा अंदाज येईल. लस टोचून घेणाऱ्यांची संख्याही वाढेल.
दुसरीकडे, भारतीय नागरिकांना मात्र चीनने “येऊ नका,’ असंच स्पष्टपणे सांगून टाकलंय. कारण चीनमध्ये जायचं असेल तर सायनोफार्मा या चिनी कंपनीची लस घेणं अनिवार्य आहे. ही लस भारतात येण्याचं काही कारणच नाही. ही अट लागू करण्यासाठी चीनने निवडलेल्या वीस देशांची नावं पाहिली, तरी या अटीमागचा दृष्टिकोन लक्षात येईल. भारत चीनची “दृष्टी’ही ओळखतो आणि “कोन’सुद्धा! इम्रान खान यांच्यावर उपचार करण्यासाठी चिनी डॉक्टरांचं पथक आलं तरी आश्चर्य वाटणार नाही!