नवी दिल्ली : कॉंग्रेसच्या हायकमांडने राज्यातील घडामोडींवर तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी स्वतः या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. परमबीर सिंह लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेस विनाकारण बदनाम होत असल्याचे पक्षाकडून म्हटले जात आहे.
काँग्रेसकडून आजच्या आज बैठक घेऊन अहवाल मागवला आहे. मुंबईतील बैठकीच्या अहवालावर स्वतः सोनिया गांधी आणि राहुल गांधी निर्णय घेणार आहेत. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्ब प्रकरणात कॉंग्रेसची विनाकारण बदनामी होत असल्याचे हायकमांडने म्हटले आहे. परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राष्ट्रवादी आणि सरकारच्या पातळीवर डॅमेज कंट्रोलसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते सरकारची बाजू लावून धरताना दिसत आहेत. परंतु, या सगळ्यात काँग्रेसचे नेते म्हणावे तितके सक्रिय झालेले नाहीत. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेही या सगळ्यावर फारसे बोलताना दिसत नाहीत.
दिल्लीत काँग्रेसच्या गोटात हालचाली सुरु झाल्या आहेत. हायकमांडने राज्यातील काँग्रेस नेत्यांकडे या सगळ्या परिस्थितीचा अहवाल मागितला आहे. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी एच.के. पाटील यांनी रविवारी रात्री व्हिडीओ कॉन्फरन्स घेऊन राज्यातील नेत्यांना यासंदर्भात निर्देश दिले. त्यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात या प्रमुख नेत्यांशी चर्चा केली. त्यामुळे आता काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी या सगळ्यासंदर्भात काय भूमिका घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत काल काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली. दीड तासांपेक्षा अधिक काळ ही बैठक चालली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची गरज नसल्याचे म्हटले आहे.