शासकीय आदेशाचे काटेकोर पालन करण्यावर देहू संस्थान ठाम
वारकऱ्यांनी एकजूट दाखविण्याची बंडातात्या कराडकर यांची हाक
श्रीक्षेत्र देहूगाव – जगद्गुरू संत तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा (तुकाराम बीज) अवघ्या आठ दिवसांवर येवून ठेपला आहे. करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदा शासकीय नियमांचे पालन करीत सोहळा केला येईल, हे दोन दिवसांपूर्वी स्पष्ट झाले आहे; मात्र आता बीजोत्सवाबाबत शासकीय आदेशाचा छेद देणारी भूमिका वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी घेतली आहे. त्यामुळे शासन आणि वारकरी यांच्यातील संभ्रमाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संत तुकाराम महाराज यांचा मंगळवारी (दि. 30) होणाऱ्या बीज उत्सवासाठी वारकरी, भाविकांनी दिंडीकर यांनी “चलो देहू, चलो देहू’ तीर्थक्षेत्र देहूत येण्याचे आवाहन बंडा तात्या कराडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमांतून केल्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या बीजोत्सवा संदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे.
जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज यांचा 373 वा बीज सोहळा अर्थात सदेह वैकुंठ गमन सोहळा 30 मार्च रोजी संपन्न होत आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाने वारकरी-भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आणि करोनाचा वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी 50 भाविकांमध्ये सोहळा संपन्न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, वारकरी संप्रदयाचे बंडातात्या कराडकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देहूत एकत्र येण्याचे आवाहन केले आहे.
बीजोत्सव संपन्न करण्यासाठी भाविकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून केले असून, त्यासंदर्भातील संदेश व्हॉट्स अप माध्यमांनी व्हायरल केले आहेत. त्यामुळे बीजोत्सव कसा संपन्न होणार, असा संभ्रम निर्माण झाला आहे. देहूमध्ये सध्या 37 करोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण असून, त्यादृष्टिने प्रशासकीय नियमांचे पालन होणे आवश्यक आहे.
हरिनामाचा जप करावा…
करोनाचा वाढता प्रादुर्भावामुळे शासनाने घालून दिलेल्या निर्बंधाचे पालन करून श्री संत तुकाराम महाराज संस्थान बीज उत्सव 50 वारकरी, भाविकांच्या उपस्थितीत संपन्न करणार आहे. वारकरी, भाविक आणि दिंडीकरांनी देहूत बीज उत्सवासाठी येवू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.
त्याचप्रमाणे नागरिकांनी, भाविकांनी, वारकऱ्यांनी घरीच भजन, कीर्तन, पारायण, हरिनाम करीत सदेह वैकुंठ गमन सोहळा अर्थात बीज उत्सव संपन्न करावा. शासनाचे निर्बंध आणि करोनाला आळा घालण्यासाठी मास्क वापर, वारंवार हात धुणे, सॅनिटायझर वापर अशा त्रिसूत्रीचे पालन करीत दक्षता घ्यावेत, असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त हभप संजय महाराज मोरे यांनी केले आहे.
राज्यातील हॉटेल, ढाबे, चहावाले, दारूची दुकाने खुली आहेत. यामुळे करोनाचा प्रादुर्भाव होतो, तरीही हे खुले आहेत. शासनाकडून केवळ धार्मिक स्थळांच्या उत्सवांवर बंदी घातली जाते. बीजोत्सवाला बंदी घालणे योग्य नाही. त्यापेक्षा काही बंधने आणि नियम घालून द्यावेत. त्याचे वारकरी संप्रदाय पालन करेल. मात्र बीज सोहळा 50 भाविकांमध्ये संपन्न करणे योग्य नाही. त्यासाठी आम्ही देहूत येणार आहोत. वारकऱ्यांवर गुन्हे दाखल झाले तरी बीजोत्सवाला वारकरी येतील.
– हभप बंडातात्या कराडकर
वारकऱ्यांच्या भावना प्रशासनाने जाणून घेतल्या पाहिजेत. शासनाने यातून मार्ग काढून वारकरी-भाविकांवरही निर्बंध घालून बीज उत्सव साजरा केला पाहिजे. सर्वत्र मॉल, बार, रेस्टॉरंट, हॉटेल सर्वच सुरू आहेत. करोना संदर्भातील दक्षता वारकऱ्यांनी, नागरिकांनीही पाळली पाहिजे.
– हभप पांडुरंग महाराज घुले, संस्थापक, गाथा मंदिर.
संत तुकाराम महाराज बीज सोहळ्यासंदर्भात शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. नियमांचा भंग करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच कोविड रुग्णसंख्या वाढत असून, देहूगाव परिसरात शासकीय आदेशाचे तंतोतंत पालन करण्यात येईल.
– विलास सोंडे, पोलीस निरीक्षक, देहूरोड पोलीस ठाणे