पुणे – कसोटी पाठोपाठ टी-20 सामन्यांची मालिका जिंकलेल्या भारतीय संघाचा आज येथील गहुंजे मैदानावर इंग्लंडविरुद्धचा पहिला एकदिवसीय सामना रंगणार आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेतही विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला सातत्य कायम राखावे लागणार आहे.
भारतात दाखल झाल्यापासून इंग्लंड संघाने चांगली लढत दिली असली तरीही त्यांना आधी कसोटी तर नंतर टी-20 सामन्यांची मालिका गमवावी लागली. या मालिकेत इंग्लंडच्या पहिल्या तीन फलंदाजांनीच भारताला खरी लढत दिली. त्यांचे भरवशाचे फलंदाज सातत्याने अपयशी ठरल्यामुळे त्यांना चांगल्या सुरूवातीनंतरही सामने जिंकता आले नाहीत. त्यांनी कसोटी व टी-20 सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी मात्र, हेच विजयी सातत्य त्यांना नंतरच्या सामन्यांमध्ये दाखवता आले नाही व त्यामुळेच या दोन्ही मालिका त्यांना गमवाव्या लागल्या.
जेसन रॉय, जॉनी बेअरस्टो, जोस बटलर व काही प्रमाणात अष्टपैलू बेन स्टोक्स यांनी सरस कामगिरी केली मात्र, त्यांच्या गोलंदाजांना भारताच्या प्रमुख फलंदाजांवर वर्चस्व राखता आले नाही. त्यांचे गोलंदाजही संभ्रमात असल्याचे स्पष्ट दिसून आले. मार्क वूडकडून त्यांना खूप अपेक्षा होत्या. मात्र, त्याने सातत्याने निराशाच केली. तसेच लेग स्पीन गोलंदाज आदिल रशिद याला काही प्रमाणात मर्यादित षटकांच्या सामन्यांत यश मिळाले परंतु ते पुरेसे नव्हते. आता त्यांना आणखी एक धक्का बसला असून त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जाफ्रा आर्चर याने या मालिकेतून माघार घेतल्यामुळे भारताच्या फलंदाजांना सुरुवातीच्या षटकांपासून अडचणीत आणण्यात ते अपयशी ठरण्याचीच शक्यता जास्त आहे.
दुसरीकडे भारतीय संघाचा आत्मविश्वास उंचावला आहे. कसोटी मालिकेपाठोपाठ टी-20 मालिका जिंकल्यामुळे सर्व खेळाडू एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठीही सज्ज बनले आहेत. भारताची फलंदाजी खोलवर असली तरीही अखेरच्या पाच फलंदाजांना संघासाठी उपयुक्त कामगिरी करावी लागणार आहे.
सलामीचा प्रश्न पाचव्या टी-20 सामन्यात कर्णधार विराट कोहलीने सोडवला. मात्र, आता एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत तो सलामीला येण्याची शक्यता खूपच कमी आहे. हिटमॅन रोहित शर्मा पाचव्या टी-20 सामन्यातील अफलातून खेळीने भरात आल्यामुळे भारतीय संघाला दिलासा मिळाला आहे. त्याच्यासह डावाची सुरूवात कोण करणार हे अद्याप गुलदस्त्यातच आहे. संघात शिखर धवन असल्यामुळे त्याला रोहितसह सलामीला पाठवणार की शुभमन गिलला संधी देणार हे महत्त्वाचे ठरेल कारण धवनला सातत्याने अपयशाचा सामना करावा लागत आहे.
कर्णधार कोहली, रोहित, नवोदित सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंड्या, कृणाल पंड्या अशी तगडी फलंदाजी भारताकडे आहे. त्यातच एकदिवसीय सामन्यांत पदार्पण करण्यासाठी सज्ज बनलेला सूर्यकुमार यादव प्रचंड भरात असल्याने भारताला मधल्या फळीतील फलंदाजाची चिंता मिटली आहे. गोलंदाजीतही पाहुण्यांपेक्षा भारतीय संघच जास्त सरस आहे. भुवनेश्वर कुमार, टी. नटराजन, महंमद सिराज, शार्दुल ठाकूर यांच्यापैकी दोन गोलंदाजांना अंतिम संघात संधी मिळेल.
टी-20 मालिकेत केलेल्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे भुवनेश्वरच्या जोडीला ठाकूरचा समावेश निश्चित मानला जात आहे. तसेच फिरकी गोलंदाजीची मदार यजुवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर यांच्यावरच राहणार आहे. हा सामना जिंकत एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी देण्यासाठी भारतीय संघ सज्ज बनला आहे.
सूर्यकुमारची कामगिरी निर्णायक ठरेल
टी-20 सामन्यांत पदार्पण केलेल्या सूर्यकुमारला एकदिवसीय सामन्यांतही पदार्पण करण्याची संधी दिली जाईल याचे संकेत मिळत आहेत. टी-20 सामन्यांच्या मालिकेत त्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर संघाला मोठी धावसंख्या उभारुन देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. कर्णधार कोहली देखील त्याच्या गुणवत्तेवर प्रभावीत झाला असल्याने त्याचा समावेश निश्चित मानला जात आहे. त्यामुळे पहिल्याच सामन्यात त्याच्याकडून चौकार व षटकारांची बरसात अपेक्षित आहे.