राज्यात सध्या सुरू असलेले वादंग अजून थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. रोज नवीन गौप्यस्फोट केले जात आहेत. नेत्यांच्या पाठोपाठ होणाऱ्या पत्रकार परिषदा, दाव्यांवर केले जाणारे प्रतिदावे, बदल्या, कोर्टात खटले दाखल करणे, अशा प्रकरणांमुळे चक्रावून टाकणारे वातावरण निर्माण झाले आहे. त्यातून या प्रकरणाचा शेवट नेमका कसा होणार आहे, याची आता उत्सुकता निर्माण झाली आहे.
मूळ प्रकरण अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांची गाडी कोणी ठेवली हे आहे. तो विषय कुठल्या कुठे भरकटवला गेला. “लेटर बॉम्ब’मुळे त्याला वेगळेच परिमाण लाभले. आज लोकसभेतही या प्रकरणावरून वादंग माजवले गेले. त्यातून महाराष्ट्राची पुरती शोभा झाली आहे. राज्याच्या लौकिकाला त्यातून बाधा येत आहे, हे लक्षात घेण्याची जबाबदारी कोणाची ही बाबही महत्त्वाची आहे. गेल्या तीन-चार दिवसांत इतक्या पत्रकार परिषदा झाल्या की, त्यातून सगळेच जण पुरते भांबावून गेले. यातील काही पत्रकार परिषदा तर केवळ दुसऱ्या पक्षाचा एखादा नेता काही तरी बोलला म्हणून त्याला काही तरी उत्तर देण्यासाठी झाल्या. राज्यातील दूरचित्रवाणी वाहिन्या याचे रंगवून रंगवून वार्तांकन करीत राहिल्या. आता नॅशनल मीडियानेही यात लक्ष घातल्याने या साऱ्या प्रकरणाला मोठीच हवा दिली गेली आहे. हे सगळे ठरवून चालले आहे, हे सहजपणे कोणाच्याही लक्षात येईल.
राज ठाकरे किंवा शरद पवार म्हणतात ते अगदी खरे आहे की, मूळ विषय हा अंबानी यांच्या घराच्या बाहेर स्फोटकांची गाडी कोणी ठेवली हा आहे. त्याचबरोबर मनसुख हिरेन यांची हत्या कोणी केली हाही महत्त्वाचा विषय आहे. या दोन महत्त्वाच्या विषयांवर तपास केंद्रित होणे आवश्यक असताना, सचिन वाझे यांना कामावर कोणी घेतले येथपासून वाझेंना गृहमंत्र्यांनी शंभर कोटी रुपयांचे टार्गेट कसे दिले या विषयापर्यंत अनेक स्वरूपाचे फाटे त्याला फोडले गेले. आक्षेपांचे मुद्दे उपस्थित करण्यालाही काही ताळतंत्र असला पाहिजे, त्याचेही येथे भान राखले गेले नाही.
गेल्या काही दिवसांतील भाजपने चालवलेला आकांडतांडव लक्षात घेतल्यानंतर या मूळ प्रकरणाच्या खोलात जाऊन तपास करण्यात त्यांना स्वारस्य आहे की नाही, हेच लक्षात येईनासे झाले आहे. या प्रकरणात काही बाबतीत मुद्दाम दिशाभूल करण्याचेही प्रकार घडल्याचे लोकांच्या लक्षात आले आहे. परमवीरसिंह यांनी जो लेटर बॉम्ब फोडला त्याचे वृत्तांकन करताना दूरचित्रवाणी वाहिन्यांनी गृहमंत्र्यांनी परमीवरसिंह यांच्याकडे शंभर कोटींचे वसुलीचे टार्गेट दिल्याची बातमी सर्रास चालवली. पण वास्तविक परमवीरसिंह यांच्या पत्रात तसा कोणताच उल्लेख नव्हता. अनिल देशमुख यांनी सचिन वाझेंना हे टार्गेट दिल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते. दोन दिवसांनी त्या संबंधीच्या वार्तांकनात दुरुस्ती झाली. जर अनिल देशमुखांनी वाझेंना हे टार्गेट दिले असेल तर त्या विषयी वाझेच माहिती देऊ शकतील, त्यात परमवीरसिंह नावाच्या त्रयस्त व्यक्तीने हा उपद्व्याप करण्याची गरज काय होती आणि मुळात बदलीचा आदेश झाल्यानंतर त्यांनी हे पत्र का पाठवले हेही महत्त्वाचे मुद्दे नंतर उपस्थित झाले.
वाझे यांना मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांनी नव्हे तर परमवीरसिंह यांनीच पुन्हा कामावर घेतल्याची बाबही लोकांपुढे ठळकपणे आली. 15 फेब्रुवारीला वाझे हे अनिल देशमुखांना भेटल्याचा दावा झाल्यानंतर त्या दिवशी देशमुख हे करोनाबाधित झाल्यामुळे रुग्णालयात होते ही नवी माहिती पुढे आली. ती माहिती पुढे करून शरद पवारांनी देशमुख यांना जवळपास क्लीन चिटच दिल्यासारखी स्थिती निर्माण झाली. पण भाजपने पुन्हा त्यात ट्विस्ट आणून 15 फेब्रुवारी रोजी अनिल देशमुखांनी पत्रकार परिषद घेतल्याचा आणखी एक मुद्दा पुढे केला. ज्या क्षणी भाजपने हा मुद्दा पुढे केला त्याच क्षणी अनिल देशमुखांनीही त्याविषयी खुलासा करणारा व्हिडिओ जारी केला.
15 फेब्रुवारीला मला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला, रुग्णालयातून घरी जात असताना गेटवर काही पत्रकार थांबले होते तेथे मी त्यांच्याशी दोन मिनिटे बोललो एवढेच! असा त्यांचा खुलासा होता. हा सगळा घटनाक्रम अत्यंत वेगवान पद्धतीने लोकांच्या पुढे येत आहे. लोकांचीही घरबसल्या त्यात चांगली करमणूक होत आहे. एकुणातच हे प्रकरण आता इतक्या रंजक पातळीवर गेले आहे की आता त्याचा शेवट नेमका काय होणार यावर पैजा लागू लागल्या आहेत. या सगळ्या बातम्या येत असतानाच महाराष्ट्र एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणाचा तिढा सोडवल्याचीही बातमी येऊन धडकली. एकाच प्रकरणाचा दोन वेगवेळ्या यंत्रणांकडून तपास सुरू आहे. यात महाराष्ट्र एटीएसने दिल्लीच्या एनआयएवर मात केली असल्याचेही स्पष्ट झाले आहे. राजकीय नेते काहीही म्हणोत, पण या इतक्या गाजलेल्या प्रकरणात प्रत्यक्षात नेमके काय झाले आहे ते लोकांच्या पुढे ठळकपणे मांडले गेले पाहिजे. आता ही जबाबदारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पार पाडावी लागणार आहे. या प्रकरणात ठाकरे अजून काहीच बोलले नाहीत. त्यांना आता जनतेपुढे येऊन सत्यकथन करावे लागेल.
सरकारचे प्रमुख म्हणून त्यांच्यापुढे आलेला सारा तपशील त्यांनी खुलेपणाने जनतेपुढे ठेवला पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या कारभारालाही आज चौदा महिने पूर्ण झाले आहेत. त्यामुळे ते आता तितके नवखे राहिलेले नाहीत. शिवसेना पक्षप्रमुख म्हणून त्यांची जितकी कठोर आणि ठाम भूमिका लोकांच्या मनात ठसली होती, त्याच्या अगदी विरुद्ध अशी भूमिका मुख्यमंत्रिपदावर बसून त्यांनी निभावली आणि ते समंजस व मवाळ व्यक्तिमत्त्व असल्याचे लोकांना दिसून आले आहे. तथापि, या साऱ्या प्रकरणात महाराष्ट्राची संपूर्ण देशात इतकी मोठी नाचक्की झाल्यानंतर आता मात्र त्यांना आपले मूळ स्वरूप दाखवत भूमिका बजवावी लागणार आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणाचा सध्या सुरू असलेला पोरखेळ थांबवण्याचे काम त्यांनाच करावे लागणार आहे. बारीकसारीक विषयावरून थयथयाट करणाऱ्यांनाही त्यांना वठणीवर आणावे लागणार आहे. हा विषय ते कसा हाताळतात यात त्यांच्या नेतृत्वाची खरी कसोटी लागणार आहे. कारण गेल्या चौदा महिन्यांत थेट सरकारच्याच विश्वासार्हतेला धक्का लावणारे प्रकरण त्यांच्या समोर आले नव्हते. आता ते आले आहे. आता उद्धव ठाकरेंना त्यांच्यातील नेतृत्व गुणांची, निष्पक्षतेची आणि कार्यक्षमतेची सारीच सिद्धता दाखवून द्यावी लागणार आहे. भाजपनेही या प्रकरणांमध्ये आता भलत्यासलत्या मुद्द्यांच्या वावटळी उठवण्यापेक्षा तपास करणाऱ्या यंत्रणांवर विश्वास ठेवावा आणि त्याचे निष्कर्ष पुढे येईपर्यंत जरा धीर धरावा. अन्यथा त्यांनी चालवलेला हा सारा खटाटोप केवळ सत्तेच्या हव्यासाचाच होता असा समज लोकांमध्ये निर्माण होईल आणि त्यातून त्यांचीही नाचक्कीच होईल.