मुंबई – देशात आणि राज्यात धुमाकूळ घालणाऱ्या करोना संसर्गामुळे अनेक लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. मध्यंतरी काही दिवस दिलासा मिळाल्यानंतर करोना रुग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षी करोना काळात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टप्प्याटप्यात अनलॉक करत स्थिती सांभाळली होती. त्यांना आरोग्य विभागाची भक्कम साथ मिळाली. मात्र आरोग्य विभागाकडून आता उद्धव ठाकरे यांच्या कामाचे कौतुक होत आहे.
प्रसिद्ध डॉक्टर तात्याराव लहाने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक केलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शन आणि सहकार्यामुळं आपण करोनाविरुद्धच्या लढ्यात लक्षवेधी काम करू शकलो, असंही डॉ. लहाने यांनी सांगितले. यापूर्वीही उद्धव ठाकरे यांचं नाव देशात उत्कृष्ठ काम करणाऱ्या पहिल्या पाच मुख्यमंत्र्यांमध्ये आलं होतं.
मुख्यमंत्री ठाकरे यांनी करोनाचा खूप जास्त अभ्यास केला आहे. आम्हा डॉक्टरांपेक्षा त्यांचं करोनाविषयी अधिक ज्ञान असल्याचं जाणवत असंही डॉक्टर लहाने यांनी सांगितलं. महाराष्ट्रात आज आपण रोज दोन लाख करोना टेस्ट करू शकतो एवढ्या टेस्ट लॅब आहेत. राज्यातील करोनाचा मृत्यू दर ३८ टक्क्यांवरून अडीच टक्क्यांवर आणण्यात आपल्याला यश आलं आहे. केवळ सरकारच्या आणि मुख्यमंत्र्यांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचं डॉ. लहाने यांनी नमूद केलं.