नवी दिल्ली – मद्यसम्राट विजय मल्ल्या, हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांना कायद्याला सामोरे जाण्यासाठी भारतात आणले जाईल, अशी ग्वाही केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरूवारी दिली.
राज्यसभेत विमा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली. त्यावेळी कोट्यवधी रूपयांचे बॅंक घोटाळे करून देशाबाहेर पलायन केलेल्यांचा विषय उपस्थित झाला. संबंधित चर्चेला उत्तर देताना सीतारामन यांनी देशाबाहेर पळून गेलेल्यांना परत आणण्याबद्दल विश्वास व्यक्त केला.
नीरव आणि मल्ल्या ब्रिटनमध्ये आहेत. तर, चोक्सी अँटिग्वात असल्याचे समजते. त्यांच्या प्रत्यार्पणासाठी सरकार प्रयत्नशील आहे.
मल्ल्याने बॅंकांना कर्जाच्या रूपाने 9 हजार कोटी रूपयांचा गंडा घातला. भारतीय यंत्रणांचा ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने मार्च 2016 पासून ब्रिटनमध्ये तळ ठोकला आहे. तर, नीरव आणि त्याचा मामा चोक्सी यांनी पंजाब नॅशनल बॅंकेला फसवले.
एकट्या नीरव याच्यावर 14 हजार 500 कोटी रूपयांच्या बॅंक घोटाळ्याचा आरोप आहे. त्यांना भारतात आणण्यासाठी यंत्रणा विविध स्तरांवरून प्रयत्न करत आहेत. त्यामध्ये न्यायालयीन लढ्याचाही समावेश आहे.