नगर – करोना विषाणूमुळे घोषित झालेल्या लॉकडाऊन काळात मागील वर्षभर महापालिकेच्या गाळ्यांमधून व्यवसाय करणारे व्यापारी अर्थिक अडचणीत सापडलेले आहेत. त्यांना किमान भाडेपट्ट्यात दिलासा देण्यासंदर्भात नगरविकास विभागाने तातडीने निर्णय घ्यावेत, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी आज नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
आमदार जगताप यांनी आज नगरविकासमंत्री शिंदे यांना निवेदन दिले. महानगरपालिकेलच्या मालकीच्या विविध व्यापारी संकुलात भाडेतत्वावरील गाळ्यांत छोटे व्यावसायिक व्यापार करतात. तथापि, कोविड-19च्या प्रादुर्भावाने यावर्षी त्यांचे व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडले आहेत. सद्यस्थितीत गाळ्यांचे भाडे भरणे देखील त्यांना शक्य नाही. त्यामुळे या व्यापार्यांना भाडेपट्ट्यातून दिलासा देण्यासाठी सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी नगरविकासमंत्री शिंदे यांच्याकडे केली.
महापालिकेलच्या मालकीच्या शहरातील व्यापारी संकुलात साधारण 840 गाळेधारक आहेत. कोविड-19च्या अगोदर देखील त्यांचे व्यवसाय फार तेजीत नव्हतेच. त्यात लॉकडाऊन झाले. व्यवसाय पूर्णत: बंद झाले. त्यातून अनेक व्यावसायिकांची अक्षरश: जगण्याची लढाई सध्या सुरु आहे. अशावेळी त्यांना किमान भाडेपट्ट्यात दिलासा मिळावा, अशी मागणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. मंत्री महोदयांनी त्यास सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे.
आमदार संग्राम जगताप.