मुंबई – हिंदी चित्रपट सृष्टीतील निर्माते अनुराग कश्यप आणि अभिनेत्री तापसी पन्नु यांच्यावर आज आयकर विभागाने छापे टाकले. पुणे आणि मुंबईत त्यांच्याशी संबंधीत एकूण 20 ठिकाणांवर हे छापे घालण्यात आले आहेत.
अनुराग कश्यप आणि तापसी पन्नु यांनी मोदी सरकारवर विविध विषयांच्या अनुषंगाने आत्तापर्यंत अनेक वेळा टीका केली होती. अनेक राष्ट्रीय विषयावर ते दोघेही सतत टिपण्णी करीत आले आहेत. त्यात सरकारचाच विरोध अनेक वेळा दिसून आला आहे.
रिहानाच्या पोस्टवर भारतातील काहीं सेलिब्रेटींनी सोशल मिडीयावर टीका करीत सरकारची पाठराखण केली होती. त्या प्रकरणात तापसी पन्नु हिने भारतातील सेलिब्रेटींवर निशाणा साधला होता. त्यामुळे ती सरकारच्या रडावर असावी असे सांगितले जात आहे.
या सेलिब्रेटींवर टीका करताना तापसीने म्हटले होते की, केवळ एखाद्या ट्विटमुळे तुमच्या एकतेला बाधा येत असेल, एखाद्या विनोदी टिपण्णीमुळे तुमच्या श्रद्धांना ठेस पोहचत असेल, किंवा एखाद्या शोमुळे तुमच्या धार्मिक भावना दुखावत असतील तर तुम्हालाच तुमच्या मुल्यांना भक्कम करावे लागणार आहे. त्यावरून तुम्ही दुसऱ्यांना शहाणपणा शिकवण्याच्या भानगडीत पडता कामा नये असे तिने या सेलिब्रेटींना उद्देशून म्हटले होते.
दरम्यान, महाराष्ट्रातील मंत्री नवाब मलिक यांनी कश्यप आणि पन्नु यांच्यावरील छाप्याचा निषेध केला आहे. मनमोकळेपणाने आपली मते व्यक्त करणाऱ्या या व्यक्तींवर करण्यात आलेली ही कारवाई पुन्हा एक राजकीय आकसाचे आणखी एक उदाहरण आहे. हा त्यांचा आवाज दाबण्याचाच प्रकार आहे असे मलिक यांनी म्हटले आहे.