नवी दिल्ली – महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेश या राज्यात करोना बाधितांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. बदलत्या स्थितीचा आढावा घेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी करोना विरोधातील लसीकरणाच्या मोहीमेला गती देण्याच्या सूचना केल्या आहेत. सरकार आता 50 पेक्षा जास्त वय असणाऱ्या नागरिकांना लस देण्याची प्रक्रिया सुरू करणार असून त्यासाठी खासगी क्षेत्राचीही मदत घेतली जाणार असल्याचे सूतोवाच करण्यात आले आहे.
या टप्प्यात 27 कोटी नागरिकांना लस देण्याचे उद्दीष्ट निर्धारीत करण्यात आले आहे. कमीत कमी वेळेत लसीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठीच आता खासगी क्षेत्राची मदत घेतली जाणार आहे. ज्या लोकांचे वय 50 पेक्षा कमी आहे, मात्र त्यांच्यामार्फत करोनाचा प्रादुर्भाव वेगाने होऊ शकतो अशी शंका घेता येउ शकते त्या लोकांनाही याच टप्प्यात लस दिली जाणार आहे.
लसीकरणाच्या मोहीमेत खासगी क्षेत्राची भूमिका काय असेल याची संपूर्ण रूपरेषा लवकरच तयार केली जाईल असे नीती आयोगाचे सदस्य व्हि के पॉल यांनी सांगितले. करोना विरोधातील लढ्यासाठी केंद्र सरकारने जी टीम स्थापन केली आहे, त्याचे पॉल हे प्रमुख आहेत. ते म्हणाले की आरोग्य कर्मचारी आणि फ्रंट लाइन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या लसीच्या मोहीमेतही खासगी क्षेत्र सहभागी आहे. जर दिवसाला दहा हजार लस दिल्या जात असतील तर त्यातील दोन हजार लस त्यांच्याकडूनच दिल्या जात आहेत. पुढच्या काळात लसीकरणाचा वेग जसजसा वाढवला जाईल तसतसा यातील खासगी क्षेत्राचा सहभाग वाढत जाणार आहे. जास्तीत जास्त लोकांना लवकरात लवकर लस दिली जाण्यासाठी त्यांचा सहभाग वाढवणे आवश्यक असल्याचे पॉल यांनीही नमूद केले.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येत्या काळात रोज 50 हजार जणांना लस देण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. यातील 40 ते 40 टक्के लसीकरण खासगी क्षेत्राच्या मार्फतच केले जाणार आहे.