मुंबई – केंद्र सरकारने सहा लाख कोटी रुपयांच्या सरकारी मालमत्ता व्यावसायिक पातळीवर खासगी क्षेत्राकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. यावर कॉंग्रेसने टीका केल्यानंतर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कॉंग्रेसच्या काळातही सरकारी मालमत्ता खाजगी क्षेत्राकडे सोपविण्याचे निर्णय झाले असल्याचे सांगितले.
कॉंग्रेसच्या काळातील सरकारने जमिनी आणि खाणी खासगी क्षेत्राला हस्तांतरित करून त्या काळात दलाली घेतली होती असा आरोप सीतारामन यांनी केला. मुंबई – पुणे एक्सप्रेस वेच्या माध्यमातून कॉंग्रेस सरकारने 8,000 कोटी रुपये उभे केले होते. त्याचबरोबर नवी दिल्ली रेल्वे स्थानक खासगी क्षेत्राकडे सोपविण्यासाठी प्रस्ताव जारी केला होता.
कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी त्या वेळी त्यांना न आवडणारी अधिसूचना जाहीरपणे फाडली होती. मात्र दिल्लीत रेल्वेसनकाला खाजगी क्षेत्राकडे सोपविण्याचा प्रस्ताव त्यांनी का पडला नाही असा सवाल सीतारामन यांनी केला.
त्याचबरोबर राष्ट्रकुल स्पर्धावेळी पायाभूत सुविधाचे काय झाले असा सवालही त्यांनी केला. सीतारामन म्हणाल्या की सध्याच्या प्रस्तावानुसार सरकारी मालमत्ता खासगी क्षेत्राला विकल्या जात नाहीत तर केवळ त्यांचा व्यावसायिक दृष्टया वापर होणार आहे. त्यामुळे पडून असलेल्या मालमत्ता वापरात येणार आहेत. त्यामुळे या मालमत्ताचा देशासाठी वापर होईल आणि काही प्रमाणात अर्थार्जन होईल असे त्यांनी सांगितले