पुणे – ज्यांना आपले गाव सोडून दुसरीकडे जावे लागते, त्यांच्याबद्दल मी काय बोलणार, असा टोला राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.
रविवारी पवार पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी पवार यांनी पाटील यांच्या टीकेला खास शैलीत प्रत्युत्तर दिले. पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात नाव असलेल्या मंत्र्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाकडून करण्यात येत आहे. या अनुषंगाने “पूजा चव्हाण आत्महत्या आणि धनंजय मुंडे प्रकरणावर शरद पवार गप्प का आहेत’, असा सवाल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला होता. या टीकेच्या पार्श्वभूमीवर पवारांना त्यांची भूमिका विचारली. “ज्यांना आपला गाव सोडून दुसरीकडे जावे लागते. त्यांच्याबद्दल मी काय बोलणार’, असे पवार म्हणाले.
गोगोई यांचे विधान धक्कादायक
पंतप्रधानांनी न्यायव्यवस्थेचा केलेला गौरव वाचून बरे वाटले पण, राज्यसभेवर पाठवलेले आणि माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांचे विधान प्रत्येकासाठी चिंता निर्माण करणारे आहे, असे मतही पवार यांनी व्यक्त केले. गोगोई यांनी भारतीय न्यायव्यवस्था जीर्ण झाले असल्याचे मत व्यक्त केले होते.