मुंबई – राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यपाल अधिक सक्रिय दिसत आहेत. राज्यपाल आणि सरकार यांच्यातील संघर्ष सामान्य बाब असली तरी गेल्या काही दिवसांत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी आणि ठाकरे सरकार संघर्ष चर्चेचा विषय ठरत आहे. अशातच राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचे समोर आले आहे. यामुळे विमानातून उतरण्याची राज्यपालांवर आली आहे.
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी हे देहरादूनला जात होते. त्यावेळी ते सरकारी विमानाने निघाले होते. परंतु, राज्यपालांच्या या प्रवासाला ठाकरे सरकारने परवानगीच दिली नाही. यामुळे राज्यपालांवर विमानातून उतरण्याची वेळ आली. यावर विरोधी पक्षांकडून याप्रकरणी राज्य सरकारविरोधात प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. राज्य सरकारनं सूड भावनेचा अतिरेक केला, अशा शब्दात ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले प्रवीण दरेकर
“आजच्या घटनेतून राज्य सरकारमध्ये सूड भावना किती आहे, ते दिसून आले आहे. राजकारणातील मतभेद समजू शकतो, राज्यपाल घटनात्मक पद आहे. राज्यपालांवर विमानातून उतरण्याची वेळ येणे यातून राज्य सरकारची सूड घेण्याची भावना दिसून आली आहे. प्रत्येक वेळी मोदी सरकारवर बोट दाखवायचं. त्यांचं अपयश लोकांपुढे जाऊ नये यासाठी वाद निर्माण करायचा त्यावर लोकांचं लक्ष वळवायचं असा या सरकारचा कार्यक्रम आहे. ” असं म्हणत त्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.