सातारा (प्रतिनिधी) – कोरेगाव, फलटण, माण, खटाव व कराड या पाच तालुक्यांमधील नऊ ग्रामपंचायतींच्या आरक्षणाबाबतची सुनावणी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी झाली. उर्वरित दोन ग्रामपंचायतींची सुनावणी उद्या, दि. 10 रोजी होणार आहे. या संदर्भात याचिकाकर्त्यांनी आपले म्हणणे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमोर झाली.
कोरेगाव तालुक्यातील कठापूर, फलटण तालुक्यातील जावली, अलगुडेवाडी, कुरवली बुद्रुक, खटाव तालुक्यातील सातेवाडी, कराड तालुक्यातील पोतले, माण तालुक्यातील वारुगड, पिंगळी बुद्रुक व धामणी, पाटण तालुक्यातील घाटेवाडी या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदांच्या आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल झाल्या होत्या.
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार तालुकानिहाय सरपंचपदाचे आरक्षण काढण्यात आले होते. पाच तालुक्यांमध्ये 8 ते 11 फेब्रुवारीला होणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतींच्या सरपंच व उपसरपंचपदांच्या निवडी 16 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा आदेश उच्च न्यायालयाने 5 फेब्रुवारीला दिले होते.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित याचिकाकर्त्यांच्या अर्जांवर मंगळवारी सकाळी 11 पासून जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासमोर सुनावणी झाली. फलटण तालुक्यातील कुरवली व खटाव तालुक्यातील सातेवाडी ग्रामपंचायतीतील याचिकाकर्त्यांच्या विरोधी पक्षातील कार्यकर्ते उपस्थित न राहिल्याने त्यांची सुनावणी उद्या (बुधवार) होणार आहे.