मुंबई – भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आज सिंधुदुर्गात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून परिचीत असेलल्या अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे. यावेळी शाह यांनी शिवसेनेने युती तोडल्यावरून टीका केली. याला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे.
शिवसेनेला कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शहा सांगत आहेत. त्यांना हे सांगायला सव्वा वर्ष लागलं. यातच कळतंय पाणी किती मुरलंय, असा टोला खासदार अरविंद सावंत यांनी लगावला आहे. ठाकरे कुटुंब नेहमीच खरं बोलतं. त्यावेळेस जी पत्रकार परिषद झाली होती. त्यात 50-50 चा फॉर्म्युला ठरला होता. अमित शाह यांनीच हा फॉर्म्युला घोषित केला होता. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीतच झालेली ही फसवणूक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सहन झाली नाही, असं अरविंद सावंत यांनी सांगितलं.
दरम्यान विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा वाद झाला तेव्हा शाह हरियाणाला का गेले ? मुंबईत येऊन त्यावर का बोलले नाहीत ? असा सवालही सावंत यांनी केला.
तत्पूर्वी अमित शाह यांनी कोकणतील कार्यक्रमात शिवसेनेवर आगपाखड केली. शिवसेनेने बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व सिद्धांत तापी नदीत टाकून शिवसेना सत्तेत आली आहे, अशी टीका अमित शहा यांनी केली. आम्ही कुणालाही कसलंही आश्वासन दिलं नव्हतं. बंद दाराआड झालेल्या चर्चेदरम्यान मी काही आश्वासन दिल्याचं सांगितलं जातं. मी कधीच बंद कमऱ्याचं पॉलिटिक्स करत नाही. जे आहे ते सडेतोड बोलतो. ठोकून बोलतो. उघड बोलतो. मी तु्म्हाला कधीच कोणतं आश्वासन दिलं नव्हतं, असं शाह म्हणाले होते.