गोंदिया (तिरोडा) : “मुळं ज्यांच्या हातात असतात त्यांचा पराभव अशक्य आहे. तेव्हा बुथ कमिट्या मजबूत करा. प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदीही राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर उभे राहिले तरी आपण ती जागा जिंकू शकतो. गावातल्या प्रत्येक माणसापर्यंत पोहोचा आणि आपल्या विचारांचा उद्याचा महाराष्ट्र कसा असणार याची संकल्पना लोकांना सांगा. लोकांचे जी कामे असतील ती करून द्या, सरकार आपल्या विचारांचे आहे. सरकार दरबारी लोकांच्या कामाचा पाठपुरावा करा. 2024 ला तिरोडा विधानसभा राष्ट्रवादीच जिंकणार”, असा निश्चयी सूर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिरोडा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत लावला.
‘राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा – संवाद कार्यकर्त्यांशी, पक्षाच्या केंद्रबिंदूशी!’ विदर्भ-पहिला टप्पा या दौऱ्यादरम्यान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत असून त्यांना मार्गदर्शन करत आहेत. तिरोडा विधानसभा मतदारसंघात पार पडलेल्या सभेत कार्यकर्त्यांना संबोधित करताना 2024 ला तिरोडा विधानसभा राष्ट्रवादीच जिंकणार”, असा निश्चय करण्यास सांगितलं.
पुढे ते म्हणाले, ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला नेहमी भेटणं होत नाही. अशा सर्व कार्यकर्त्यांशी हितगुज साधण्यासाठी हा दौरा काढण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने या दौऱ्याची घोषणा केली आणि विरोधकांचे कान टवकारले. मात्र आमचा हा दौरा संघटनेला बळकटी देण्यासाठी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
तिरोडा येथील बैठकीला जिल्हाध्यक्ष माजी मंत्री नानाभाऊ पंचबुधे, आमदार राजूभाऊ कारेमोरे, माजी खासदार मधुकर कुकडे, माजी मंत्री विलासभाऊ शृंगारपवार, माजी आमदार राजू जैन, माजी आमदार प्रकाश गजभिये विदर्भ दौरा समन्वयक प्रविण कुंटे पाटील आणि पक्षाचे इतर प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.