पुणे – कात्रज-कोंढवा रस्त्यावर दुचाकीस्वार तरुणावर झालेल्या गोळीबार प्रकरणात नाना पेठेतील आंदेकर टोळीतील आठजणांना अटक करण्यात आली. नाना पेठेत दहशत निर्माण केल्याने तरुणावर गोळीबार करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. या घटनेत जखमी झालेल्यावरही दोन गुन्हे दाखल आहेत. पुर्व वैमनस्यातून ही घटना घडली होती.
याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या कृष्णराज सूर्यकांत आंदेकर (31 ), अनिकेत ज्ञानेश्वर काळे (25 ), ओंकार शिवप्रसाद साळुंके (21 , तिघे रा. डोके तालीम, नाना पेठ), विराज जगदीश यादव (25 ,रा. हांडेवाडी रस्ता, हडपसर), आवेझ अश्फाक सय्यद (20 , रा. गणेश पेठ), शहावेज अब्दुल रशीद शेख (34 , रा. गुरुवार पेठ), अक्षय नागनाथ कांबळे (23 , रा. ससाणेनगर, हडपसर) यांना अटक करण्यात आली आहे. विघ्नेश अशोक गोरे (20 ,रा. कात्रज) असे जखमी झालेल्याचे नाव आहे.
23 जानेवारी रोजी गोरे आणि त्याचे मित्र अतुल दरेकर, इश्वर म्हस्के दुचाकीवरून कात्रज-कोंढवा रस्त्यावरुन रात्री दहाच्या सुमारास निघाले होते. त्यावेळी दुचाकीवरुन आलेल्या आंदेकर आणि साथीदारांनी गोरेवर पिस्तुलातून गोळीबार केला होता. गोरेच्या पायाला गोळी लागल्याने तो जखमी झाला होता.
याप्रकरणात गोरेची चौकशी करण्यात आली होती. गोरेने पोलिसांना माहिती देण्यास टाळाटाळ केली होती. चौकशीत 23 जानेवारी रोजी गोरे आणि त्याच्या मित्रांनी नाना पेठेत दहशत निर्माण केली होती. या कारणावरुन चिडलेल्या कृष्णराज आंदेकर आणि साथीदारांनी गोरेला गाठून त्याच्यावर गोळीबार केल्याची माहिती तपासात मिळाल्यानंतर आठजणांना अटक करण्यात आली. पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि पथकाने ही कारवाई केली