नवी दिल्ली – गेल्या वर्षी करोनाव्हायरसमुळे खाजगी क्षेत्राकडून गुंतवणूक कमी झाली होती. मात्र या काळात पाकळी निर्माण होऊ नये याकरिता केंद्र सरकारने पुढाकार घेऊन बरीच भांडवली गुंतवणूक केली. आता परिस्थिती सुधारत असल्यामुळे खाजगी क्षेत्र गुंतवणूक वाढविणार आहे. त्यामुळे आगामी वर्षाचा विकास दर 11 टक्क्यांवर जाणार असल्याचे अर्थ मंत्रालयाचे सल्लागार के व्ही सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.
काल संसदेत सादर करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलताना सुब्रह्मण्यम म्हणाले की, भारताची अर्थव्यवस्था आता मोठ्या वेगाने आगेकूच करणार आहे. त्यामुळे पुढील वर्षापासून भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था ठरणार आहे.
करोना व्हायरसच्या काळात खासगी कंपन्यानी गुंतवणूक आणि खर्च कमी करून बचत करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र आता मागणी वाढू लागली आहे. या कंपन्या उत्पादनात वाढ करण्यासाठी गुंतवणूक करतील. त्यामुळे रोजगार निर्मिती वाढेल.
त्यांनी सांगितले की, पायाभूत सुविधांच्या विकासाशिवाय भारताचा विकास दर वाढणार नाही याची सरकारला कल्पना आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षापासून पायाभूत सुविधा प्रकल्पावर खर्च वाढविण्यात आला आहे. सध्या या क्षेत्रात 111 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याचे प्रकल्प सुरू करण्याची तयारी चालू असल्याचे त्यांनी सांगितले.
अर्थसंकल्प नाविन्यपूर्ण असेल
सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत. हा अर्थसंकल्प विकासाला चालना देण्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पनांचा वापर करून मांडला जाणार असल्याचे त्यांनी सूचित केले. सीतारामन यांनीही यावर्षी सादर होणारा अर्थसंकल्प कधी नव्हे इतका चांगला असेल असेल सांगितले आहे.