राहुरी,- राज्यात वीजबिलाची 45 हजार 710 कोटी रुपयांची थकबाकी आहे. राज्यातील वीजपंपधारक शेतकर्यांनी 15 हजार 325 कोटी रुपये भरले, तर व्याज व विलंब दंडाच्या आकारणीत सवलत दिली जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे सहा सौरऊर्जाप्रकल्पांच्या भूमिपूजनप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी त्यांनी राहुरी बसस्थानकाच्या अद्ययावत इमारतीसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. राहुरी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्नही त्वरित सोडविला जाईल, असे आश्वासन दिले. पवार म्हणाले, कृषी वीजबिल वसुलीसाठीच्या या योजनांचा शेतकर्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा.
जिल्ह्यात चार हजार 998 कोटी रुपयांची वीजबिल थकबाकी आहे. या रकमेची वसुली झाल्यास 66 टक्के निधी वीजनिर्मिती, वीज वितरणासाठी व जिल्ह्यातील पायाभूत सुविधांसाठी उपलब्ध केला जाईल. मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पाअंतर्गत जिराईत जमीन शेतकर्यांनी महावितरणला उपलब्ध करून दिल्यास एकरी 30 हजार रुपये महावितरणकडून दिले जातील. शासकीय जमिनी ग्रामपंचायतीने उपलब्ध करून दिल्या, तर दरवर्षी त्यांनाही उत्पन्नाचा एक निश्चित स्त्रोत उपलब्ध होईल. वांबोरी चारीच्या सुधारित दुसर्या टप्प्यासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल. निळवंडे धरणाच्या कालव्याची कामेही मार्गी लावली जातील.
महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकर्यांचे सरकार आहे, तर केंद्र सरकार शेतकरी विरोधी आहे. दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणार्या शेतकर्यांची मागणी न्याय्य आहे. मात्र, शासन त्याकडे गांभीर्याने बघायला तयार नाही. उत्पादन खर्चावर आधारित हमीभाव दिला जावा, ही शेतकर्यांची मागणी रास्त व योग्य आहे. सुप्रीम कोर्टाचेही हे सरकार ऐकायला तयार नाही. दिल्लीत शांततेत सुरू असलेल्या या आंदोलनाला बदनाम करण्यामागे, त्याला हिंसाचाराचे गालबोट लावण्यामागे निश्चितच शेतकरीविरोधी शक्ती कार्यरत आहेत. महाविकास आघाडीचे सरकार शेतकर्यांच्या मागे भक्कमपणे उभे राहील. सौरऊर्जा प्रकल्पामुळे शेती पंपांना काही प्रमाणात दिवसा वीजपुरवठा करणे शक्य होईल.
नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी प्रास्ताविकात राहुरीच्या सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष सहकार्य लाभल्याचे सांगितले. त्यामुळेच निविदा प्रक्रिया सुरू झाल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. आमदार आशुतोष काळे, आमदार संग्राम जगताप, लहू कानडे, माजी खासदार प्रसाद तनपुरे, नगराध्यक्ष अनिता पोपळघट, अनुराधा आदिक, सुरेश वाबळे, निर्मलाताई मालपाणी, धनराज गाडे, डॉ. उषाताई तनपुरे, सोनाली तनपुरे, सभापती बेबीताई सोडणर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
नव्या पेठेतील रस्त्याचे भाग्य एका दिवसात उजळले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राहुरीच्या भेटीमुळे नव्या पेठेतील रस्त्याचे भाग्य एका दिवसात उजळले. शनि मंदिर चौक ते राजमाता जिजाऊ चौक या रस्त्याची दुरवस्था झाली होती. वारंवार तक्रारी करूनही त्याची दुरुस्ती होत नव्हती. मात्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आले अन् या रस्त्याचे भाग्यच उजळले. एका रात्रीत रस्ता नवानवा झाला.
‘त्यांना’ पराभव पत्काराव लागला…!
नगर व पुणे जिल्ह्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद दिली. नगरमधून पक्षाला सात आमदार मिळालेले आहेत. मात्र, ज्यांनी विधानसभा निवडणुकीत ऐनवेळी पक्ष सोडला, त्यांना पराभव पत्करावा लागला, अशी टीकाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांचे नाव न घेता केली.
-‘हे बघा, हे पठ्ठे इथे बिना मास्कचे फिरत आहेत..!
मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटनानिमित्त वांबोरी येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार भडकले. ‘हे बघा, हे पठ्ठे इथे बिना मास्कचे फिरत आहेत. त्यांच्यापुढे आता डोके फोडून घ्यावे का? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला. करोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. हसण्यावारी घेऊ नका. काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी दिला.