पारनेर – शेतकर्यांच्या मागण्यांची पूर्तता होण्यासाठी केंद्र सरकाने उच्चस्तरीय समितीची स्थापना करण्याची घोषणा केल्याने ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आंदोलन स्थगित केले आहे. पण आंदोलन मागे घेतले म्हणजे आंदोलन थांबलेले नाही.
केंद्र सरकारने बनवाबनवी केली, तर अण्णांच्या आंदोलनामागे आम्ही ताकदीने उभे राहू, असे शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पत्रकारांशी बोलताना सांगीतले.
कडू यांनी शनिवारी (ता. 30) राळेगणसिद्धी येथे येवून हजारे यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी तब्बल एक तास शेतकर्यांच्या विविधी प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी प्रहार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष पवार, जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, शरद जोशी शेतकरी विचार मंचाचे प्रदेशाध्यक्ष विठ्ठल पवार, सुरेश पठारे, दत्ता आवारी, संदीप बामदळे, विकास गटकळ, हरिचंद्र जाधव आदी उपस्थित होते.
मंत्री कडू म्हणाले, मंत्री झाल्यावर हजारे यांची भेट झाली नव्हती. अण्णांना भेटल्यावर ऊर्जा मिळते. अधिक चांगले काम करता येते. राज्यातील शेती प्रश्नांवर अण्णांबरोबर मी चर्चा केली. राज्य, जिल्हा बदलला की शेतीचे प्रश्न बदलतात.
पालकमंत्री असलेल्या अकोला जिल्ह्यातील खिनखिनी गावात रोहयो योजनेअंतर्गत पेरणी ते काढणीपर्यंतचा शेतीचा उत्पादन खर्च कमी करून शेतकर्यांना स्वामिनाथन आयोगानुसार शेतीमाला दीडपट हमी भाव देण्याचा एक वेगळा प्रयोग राबविण्याचा संकल्प मी केला आहे. त्यासाठी अण्णांचे मार्गदर्शन घेतले.
या वेळी उपस्थित नगर येथील प्रहार अॅकॅडेमीच्या विद्यार्थ्यांना तसेच प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हजारे म्हणाले, समाजासाठी चांगलं काम करणारी जी काही माणसे आहेत, त्यात बच्चू कडू आहेत. निवडणुकीत मी कोणाचा प्रचार करीत नाही. पण बच्चू कडू यांचे काम चांगले असल्याने त्यांच्या प्रचारासाठी गेलो होतो.