पुणे – मागील दोन महिन्यांपासून शांततेत आंदोलन करणारे शेतकरी चुकीच्या मार्गाने जाऊ शकत नाहीत. दिल्लीतील प्रकार कशामुळे घडला याचा शोध घेण्याची गरज आहे. राज्यात शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय महाविकास आघाडी सरकार घेत आहे.
शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या कोणत्याही गोष्टींना थारा दिला जाणार नाही, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शुक्रवारी पुण्यात प्रसार माध्यमांशी ते बोलत होते. महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या अहिंसेच्या मार्गाने शेतकरी आदोलन करत होते.
कृषी कायद्यांना स्थगिती मिळाली असली तरी, शेतकरी आणि सरकार यांच्यात आतापर्यंत 12 ते 15 बैठका निष्फळ ठरल्या आहेत. आंदोलकांना केवळ खेळवले जात आहे, अशी टीका करत राज्यकर्ते कायद्याचा आधार घेऊन दिल्लीत आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप पवार यांनी केला.