कोल्हापूर : रेणू शर्मा प्रकरणामध्ये राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यासाठी दिलासादायक बातमी समोर आली. त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केलेल्या रेणू शर्मा यांनी मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतली आहे. या सगळ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. सत्यता पडताळून पाहिल्याशिवाय निष्कर्षाला येऊ नये, असे मी सुरुवातीलाच म्हटले होते असे वक्तव्य शरद पवार यांनी केलं आहे. ते कोल्हापूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.
‘रेणू शर्मानी केस परत घेतली असल्याचे समजले, आम्हाला प्रथमदर्शनी सातत्य पडताळण्याची गरज वाटते. याच्या खोलात जाण्याची गरज आहे असे मी आधीच म्हटलो होतो, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. आमचा निर्णय बरोबर होता असे आता वाटत आहे , त्यामुळे आता जे झाले त्यानुसार आमचा निर्णय योग्य होता’ असे शरद पवार यांनी म्हटले आहे. एकंदरीतच मुंडे यांच्यावरील विश्वास खरा ठरला असेच यावरून म्हणाव लागेल.
दरम्यान, कौटुंबिक कारणास्तव मी तक्रार मागे घेत आहे, असे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तशा प्रकारे पोलिसांना तिने लेखी लिहून दिले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांनी संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. स्वत: फेसबुक पोस्ट करुन धनंजय मुंडे यांनी रेणू शर्मा यांच्या बहिणीशी सहसंबंधाचा खुलास केला होता. मात्र पैशांच्या कारणास्तव मला करुणा यांच्या बहिण रेणू यांच्याकडून ब्लॅकमेल केलं जातंय, असं म्हणत धनंजय मुंडे यांनी रेणू यांचे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
रेणू शर्मा यांच्या आरोपानुसार जर तक्रार दाखल झाली असती तर धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली असती. मागील पंधरा दिवसांत मुंडे आरोपांनी घायाळ झाले होते. मात्र आता संबंधित तरुणीने तक्रार मागे घेतल्याने त्यांना या प्रकरणी मोठा दिलासा म्हणावा लागेल.