मुंबई : गेल्या काही दिवसांपासून बलात्काराच्या आरोपांमुळे वादात सापडलेले राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. बलात्काराचा आरोप करणाऱ्या रेणू शर्मा या महिलेने मुंडेविरोधातील बलात्काराची तक्रार मागे घेतल्याची माहिती समोर आली आहे.
कौटुंबिक कारणास्तव तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्मा यांनी तक्रार मागे घेताना सांगितले. तशाप्रकारे पोलिसांना तिने काल लेखी निवेदन दिले असल्याचे एका वृत्तवाहिनीने माहिती दिली आहे. प्रकरणाला राजकीय वळण लागल्यामुळे तक्रार मागे घेत असल्याचे रेणू शर्माने म्हटले आहे.
काही दिवसांपूर्वीच रेणू शर्माने, “मी महाराष्ट्रात एकटीच लढत आहे. कोणतीही माहिती नसताना माझ्यावर चुकीचे आरोप केले जात आहेत. तुमची सर्वांची इच्छा असेल, तर मी माघार घेते”, असे ट्विट केले होते. त्यानंतर आता तिने तक्रार मागे घेतली आहे.
धनंजय मुंडे यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत रेणू शर्मा नामक महिलेनं मुंबईतील ओशिवरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या संदर्भातील पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झाल्या होत्या. धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली होती. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी सोशल मीडियातूनच यावर खुलासा केला होता.
रेणू शर्मा हिच्याशी आपला काहीएक संबंध नाही. तिची मोठी बहीण करुण शर्मा हिच्याशी परस्पर सहमतीने मी संबंध ठेवले होते. तिच्यापासून मला दोन मुलं आहेत, अशी कबुलीही मुंडे यांनी दिली होती. मुंडे यांच्या या पोस्टनंतर खळबळ उडाली होती. त्यानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसवर मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला होता. पक्षाध्यक्ष शरद पवार यांनीही तातडीनं निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्यामुळं मुंडे यांचं मंत्रिपद जाणार अशीही चर्चा होती. पण आता आरोप करणाऱ्या महिलेनेच तक्रार मागे घेतल्याने मुंडे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.