मुंबई : मुंबई पोलिस अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या गुंडांना सोडवण्यासाठी भाजप आमदार राम कदम यांनी पोलीसांना शिफारशीसाठी फोन केला. यावर भाजप नेते राम कदम हे नेहमीच विवादाच्या भोवऱ्यात अडकलेले असतात, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.
२६/११ च्या हल्ल्यात मुंबईकरांसाठी स्वतःच्या प्राणाची बाजी लावणार्या, मुंबईकरांसाठी शहीद होणार्या पोलीसांवर हल्ला करणाऱ्यांना वाचवणार्यांची भूमिका यातून दिसून येते. भाजप पक्षाला महाराष्ट्र पोलीसांबद्दल काहीही प्रेम नाही हे यातून स्पष्ट होते, असे तपासे म्हणाले.
या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे करणार असल्याचे देखील तपासे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण…
पवई हिरानंदानी येथे गॅलरिया मॉलजवळ एक ज्येष्ठ महिला डॉक्टरच्या गाडीला दुचाकीवरुन ट्रिपल सीट जाणारे भाजपचे कार्यकर्ते धडकले. यावेळी घटनास्थळी पवई पोलीस दाखल झाले. त्यांनी आरोपी सचिन तिवारी, दिपू तिवारी आणि आयुष राजभरला ताब्यात घेतले. रिक्षाने जात असताना आरोपींनी नितीन खैरमोडे यांना रिक्षातच मारहाण केली. शिवाय त्यांच्या तोंडावर आणि गालावर हातातील कडे मारले. या घटनेत पोलीस कर्मचारी नितीन खैरमोडे यांना दुखापत झाली . त्यानंतर पोलिसांनी कारवाई करुन आरोपींना अटक केली. मात्र काही तासांच्या आत आमदार राम कदम यांनी पोलीस कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना फोन करुन आरोपींना सोडण्याची विनंती केली आणि ही ऑडियो क्लिप व्हायरल झाली.