– ह.भ.प. यमुनाबाई ग. म. फड
वाजतसे बोंब कोणी नायकती कानीं। हरि हरि न म्हणता तया थोर जाली हानी।।
संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जीवाचे कल्याण व्हावे यासाठी वेद, शास्त्रे, पुराणे भगवंताच्या नामाचा उच्चार करण्याविषयी बोंबा ठोकताहेत, पण कोणीच ऐकत नाहीत. म्हणजे वेदशास्त्राच्या म्हणण्याकडे कोणाचेही लक्ष नाही. जे वाचेने हरिनामाचा उच्चार करत नाहीत त्यांची फार मोठी हानी झालीय.
ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ। सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे।।
माऊली म्हणतात, हरिचे नाम सर्व पारमार्थिक साधनांमध्ये अत्यंत सोपे आहे. मात्र, ते सोपे असणारे हरिचे नाम दुर्लभ झालेय. ब्रम्हत्वादपि देहत्वादिद्रंत्वा दमरादपि। अमृतासिद्धि लाभाच्च हरिभक्ति: सुदुर्लभा।। गर्गसंहितामध्ये म्हटले आहे की, ब्रह्मत्व, देवत्व, इंद्रत्व, अमरत्व, अमृतप्राप्ती, सिद्धीचा लाभ यांपेक्षा हरिभक्ति ही दुर्लभ आहे. जो नाम घेईल त्याला काय मिळेल?
हरि हरि हरि मंत्र हा शिवाचा । म्हणती जे वाचा तया मोक्ष।।