-विठ्ठल वळसेपाटील
भारतभूमीसाठी अतुल्य योगदान व निरंतर प्रेरणादायी जीवन जगणाऱ्या विवेकानंदांचा जन्मदिन राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा होत असतो. त्यांचे आदर्श विचार युवकांसाठी एकप्रकारे ऊर्जास्रोत आहेत..
संत, महंत, विचारवंत, क्रांतिकारक यांनी मानव कल्याण आणि स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचले, तर काहींनी प्राणार्पण केले. मानव कल्याणाचा विचार साऱ्या विश्वाला देत हिंदू संस्कृतीची जगाला नव्याने ओळख करून देत, मानवी जीवनाला व युवाशक्तीला ऊर्जा प्राप्त करून देणारा महान संन्यासी म्हणजे स्वामी विवेकानंद.
जे जे सकारात्मक आहे ते सर्व स्वामी विवेकानंदांच्या विचारात आहे, असे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर म्हणतात. 11 सप्टेंबर 1893 रोजी शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेचा दिवस उजाडला. यात प्रत्येक धर्माचे धर्मगुरू व चार ते पाच हजार नागरिकही उपस्थित होते. कार्डिनल गिरबन्स हे या धर्म महासभेचे अध्यक्ष होते. प्रत्येक धर्माचे धर्मपंडित आपला धर्म इतर धर्मांपेक्षा कसा चांगला आहे हे सांगत होते. परंतु जेव्हा विवेकानंद उभे राहिले आणि “माझ्या अमेरिकेतील बंधू-भगिनींनो’ हे वाक्य उचारताच साऱ्या सभागृहात टाळ्यांचा पाऊस पडला. हिंदू संस्कृतीचे, सभ्यतेचे, सर्वसामावेशकता व सहिष्णुतेचे दर्शन साऱ्या जगाला झाले. त्यांनी हिंदुधर्मावरील परिपूर्ण असे भाष्य केले. त्यांचे चैतन्यपूर्ण व ओजस्वी वाणीने सारे मंत्रमुग्ध झाले. 17 दिवस ही धर्मपरिषद चालली होती.
“अमेरिकन बंधू आणि भगिनींनो, तुम्ही ज्या आदर आणि प्रेमाने माझं स्वागत केलं त्यामुळे माझं हृदय उंचबळून आलं आहे. जगातली सर्वांत जुनी संत परंपरा आणि सर्व धर्मांची भूमी असलेल्या भारत मातेतर्फे मी तुम्हाला धन्यवाद देतो. सर्व जाती आणि संप्रदायाच्या लाखो-करोडो लोकांतर्फे मी तुमचे आभार मानतो’, असे म्हणून विवेकानंद म्हणतात, “आम्ही केवळ सर्व धर्माचं स्वतंत्र अस्तित्वच मान्य करत नाहीत तर सर्व धर्मांचा सत्याच्याच रूपात स्वीकार करतो. मी त्या देशात राहतो की ज्या देशाने अन्य ठिकाणी रंजल्यागांजलेल्या लोकांना शरण दिली आहे. भारतभूमी ही आश्रय देणारी तर आहे व त्यांना आपलेसे करणारी आहे. विवेकानंद आपल्या भाषणात भगवद्गीतेतील श्लोक सांगतात, ज्याप्रमाणे नद्यांची उगमस्थाने वेगवेगळी असून त्या वेगवेगळ्या मार्गाने जाऊन सागरास मिळतात. त्याचप्रमाणे मनुष्यही आपल्या इच्छेनुसार वेगवेगळे पंथ निवडतो. हे पंथ भलेही वेगळे असो पण ते सर्व ईश्वरापर्यंत पोहोचवतात हा माझा विश्वास आहे. यातून सर्वधर्म समभाव ही शिकवण मिळते.
पुढे विवेकानंद सांगतात, सांप्रदायिकता, कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाने गेल्या अनेक वर्षांपासून या वसुंधरेला आपल्या पाशात अडकवून ठेवून धर्माच्या नावावर हिंसा केली. अनेक चांगल्या संस्कृती व देश नाहीसे झाले. कट्टरतावाद आणि धार्मिक उन्मादाविरोधात या सभेने रणशिंग फुंकले आहे.
त्यावेळी साम्राज्यवाद अनेक देशांत फोफावला होता. अनेक देश पारतंत्र्यात होते, तर आधुनिकीकरणाची सुरुवातही होत होती. अशा वेळी विवेकानंदांचे भाषण जगाला प्रेरणा व अनेक देशभक्तांना ऊर्जा देऊन गेले. विवेकानंदांनी शिकागो परिषदेत आपल्या ओजस्वी वाणीतून जगाला हिंदू संस्कृतीची ओळखच नव्हे तर व्याप्तीही दाखवून दिली. त्यांनी आपल्या भाषणातून एकूण नऊ मुद्दे मांडले. यातून त्यांनी विश्वबंधुत्व, स्वातंत्र्य, समता, सहिष्णुतेची महती जगाला सांगितली.
विवेकानंदांच्या विचाराचा साऱ्या जगावर प्रभाव पडला. सारे जग त्यांना आपले मानू लागले. त्यांचे विचार ऐकण्यासाठी व त्यांना भेटण्यासाठी जग आतुर झाले होते. विचार ग्रहण करणाऱ्या प्रत्येकाने नवा संकल्प घेऊन विवेकानंदांचे विचार जगा पुढे मांडले. हेच युवाशक्तीची प्रेरणा व ऊर्जास्रोत आहे. तो विचार आजच्या युवा पिढीने अवलंबला पाहिजे, तरच नैराश्य जाऊन एक चैतन्य निर्माण होईल.
मातृभूमीवर परतल्यानंतर विवेकानंदांनी “रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली. अनेक सामाजिक व सुधारणावादी कार्य आरंभिले. विवेकानंदांच्या विचारातून युवाशक्तीला ऊर्जा मिळाली. त्यांनी स्त्री सबलीकरणाचा मुद्धा हाती घेतला. हिंदु समाज दीन असेल, दु:खी असेल; पण बहुमूल्य अशा पारमार्थिक संपत्तीचा उत्तराधिकारी आहे. धर्माच्या क्षेत्रात तो जगद्गुरू होऊ शकतो, अशी त्याची योग्यता आहे.
धर्म संकल्पनेत त्यांचा विज्ञानवादी दृष्टीकोन होता. तो सऱ्या जगाने स्वीकारला. जगाला दीन, दुबळ्यांची सेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे. ईश्वर प्रत्येक प्राणीमात्रात आहे, असे सांगणारे युगनायक, युगपुरुष, तपस्वी, संन्यासी, निस्सीम देशभक्त अखेर कोलकत्ता शहरातील बेलूर मठात 4 जुलै 1904 रोजी समाधिस्त झाले.स्वामी विवेकानंद यांनी मांडलेले स्फूर्तीदायी विचार आजच्या तरुणांनी अंगीकारले पाहिजेत व त्यांच्या विचारांची ज्योत मनात सतत तेवत ठेवली पाहिजे.