शहरातील राजकीय वातावरण लागले तापू : संरक्षक भिंतीसाठी निधी मागणीचा मुद्दा
पुणे – आंबील ओढ्यालगतच्या संरक्षक भिंतींच्या कामासाठी राज्य शासनाकडे 300 कोटी रुपयांची मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेटही घेणार असल्याचे म्हटले आहे. मात्र, पूर येऊन दोन वर्षे उलटली, त्या काळात महापालिकेत आणि राज्यातही भाजप सत्तेवर होते. तेव्हा भाजपचे सत्ताधारी पदाधिकारी झोपले होते का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेश सदस्य प्रदीप देशमुख यांनी केला आहे.
आंबील ओढ्याच्या पुराचे पाणी सोसायट्यांत शिरले त्याकाळात महापालिकेत आणि राज्यातही सत्तेवर असताना आपण काय केले आधी सांगा. संरक्षक भिंती पडून आता दोन वर्षे उलटली त्यानंतर आता पाच महिन्यांपूर्वी निविदा काढूनही संरक्षक भिंतीचे काम ठेकेदाराने केलेले नाही. या कामातील निधीची गळती कशी झाली, याची माहिती घ्या आणि मगच संरक्षक भिंतीसाठी राज्य शासनाकडे निधीचा प्रस्ताव द्या, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.
देशमुख यांनी सांगितले की, पुण्यामध्ये सप्टेंबर 2019मध्ये महापूर आला. ओढ्याकडेच्या संरक्षक भिंती पडून पुराचे पाणी शेकडो सोसायट्यांत शिरले. पावसाची चाहूल लागल्यावर अजूनही येथील रहिवाशांना धास्ती वाटते.
मात्र, महापालिकेतील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाने दोन वर्षे काहीही केले नाही. प्रायमूव्ह इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. या सल्लागार कंपनीची नियुक्ती केली, त्यांनी 281 कोटी रुपयांचा अहवाल दिला होता. त्याप्रमाणे स्थायी समितीने 77 कोटी रुपयांची निविदा प्रक्रियाही राबविली होती. मात्र, ही कामे झालीच नाही. त्यावेळी करोनाचे संकटही नव्हते. त्यामुळे त्यामागे लपायलाही भाजपला जागा नाही.
राज्यात सत्ताबदल झाल्यावर आता महापालिका राज्य शासनाकडे निधीची मागणी करून आपली जबाबदारी झटकत असल्याचेही देशमुख यांनी म्हटले आहे.