पुणे – महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री झाल्यापासून मराठवाड्याची राजधानी समजले जाणाऱ्या औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आला आला होता. मात्र आता औरंगाबादच्या नामांतराचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विरोधीपक्ष आक्रमक झाले आहेत. यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आघाडी घेतली होती. त्यात आता भाजपने उडी घेतली असून चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या नामांतरावरून मोठे विधान केले आहे.
पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी शहरातील विविध प्रश्नांबाबत पालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेवून शहरातील विकास कामांविषयीचर्चा केली आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते.
औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्याची मागणी अनेक दिवसांपासूनची आहे. त्यावर मागील पाच वर्षे सत्तेत असलेल्या भाजप आणि शिवसेनेला मार्ग काढता आला नाही. नामांतरासाठी सर्वप्रथम मागणी करणारा शिवसेना पक्ष आता सत्तेत आहे. तर भाजप विरोधात आहे. यावरून भाजपने शिवसेनेवर दडपण टाकण्यास सुरू केले आहे. चंद्रकांत पाटील यांनी औरंगाबादच्या नामांतराविषयी पुण्यात आपली भूमिका स्पष्ट केली.
औरंगाबाद शहराचे संभाजीनगर हे नामकरण करावे याबाबत भाजपाची भूमिका स्पष्ट आहे. त्यामुळेच औरंगाबादकरांनो, महापालिकेची सत्ता आमच्या ताब्यात द्या, पहिल्याच सभेत संभाजीनगर नामांतराचा ठराव मंजूर करून दाखवतो, असे आश्वासन पाटील यांनी दिले. औरंगाबाद, अहमदनगर, उस्मानाबादची नावे बदलने हा श्रद्धेचा आणि अस्मितेचा विषय असल्याचे त्यांनी सांगितले.
औरंगजेब हा कोणाचा पूर्वज आहे का ? मुंबईत बसविण्यात आलेले आक्रमकांचे पुतळे हटविण्यात आलेले आहेत. ज्यांनी देशावर राज्य केले, जुलूम केले त्यांची नावे का मिरवायची ? औरंगजेबाचे नाव मिरवायची ज्यांना इच्छा असेल त्यांनी ते मिरवावे. मात्र औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्यात राजकारण करू नये. यावर शिवसेनेने भूमिका घ्यावी, अशी मागणीही पाटील यांनी केली.