मुंबई – महाराष्ट्रातील काही ग्रामपंचायतीत लिलाव पद्धतीने सरपंच निवडले गेले असल्याची तक्रार आल्याने राज्य निवडणूक आयोगाने संबंधीत जिल्हाधिकाऱ्यांकडून अहवाल मागवला आहे.
गावाच्या विकासासाठी स्वत:च्या खिशातून जो जास्त पैसा देईल त्याच्याकडे सरपंच पद लिलाव पद्धतीने देण्याचा प्रकार काही ठिकाणी घडला आहे. या पार्श्वभूमीवर ज्या गावाचे सरपंच बिन विरोध निवडले गेले आहेत त्यांची निवड लिलाव पद्धतीने झाली किंवा कशी याची माहिती घेऊन अहवाल सादर करण्यास सर्व जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे.
त्यांच्या अहवालानंतरच सदर सरपंचाच्या नियुक्तीला मान्यता देण्यात येईल असे राज्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. आम्ही या कथित प्रकाराची माहिती मागवली असून जिल्हाधिकाऱ्यांकडून या संबंधातील अहवाल आल्यानंतर त्या संबंधात पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त यु.पी.एस मदान यांनी सांगितली.
राज्यातील सरपंचपदाच्या निवडणुका बिनविरोधपणे पार पाडण्यासाठी अनेक आमदारांनीही प्रयत्न केले आहेत. ग्रामपंचायत संरपंच पदाच्या राजकारणातून गावात नाहक वैमनस्य व दुफळी निर्माण होत असल्याने या निवडणुका बिनविरोध करताना काही ठिकाणी विकासासाठी जादा निधी खर्च करण्याची बोली लावत लिलाव झाला आहे. तथापि या निवडणूका पारदर्शी पद्धतीनेच पार पाडण्यासाठी राज्य निवडणूक आयोग प्रयत्नशील आहे असे संबंधीतांकडून सांगण्यात आले.