नवी दिल्ली – महाराष्ट्रातील आघाडी सरकार स्थिर असून हे सरकार पाडण्याचे भाजपचे कोणतेही प्रयत्न यशस्वी होणार नाहीत, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते शरद पवार यांनी म्हटले आहे. ईडीचा वापर करून राजकीय व्यक्तींच्या कुटुंबीयांना त्रास देणे अयोग्य असून हा राजकीय अधिकाराचा दुरूपयोग आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. पीटीआय वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे प्रतिपादन केले.
पवार म्हणाले की, महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन महिन्यात आम्ही हे सरकार पाडू, असे भाजप नेते म्हणत होते. त्यानंतर सहा महिन्यांनी, नंतर आठ माहिन्यांनी सरकार पडेल असे ते सांगत राहिले.
पण आता या सरकारला एक वर्षही पूर्ण झाले आहे असे त्यांनी म्हटले आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नीला ईडीची नोटीस जारी करण्यात आली आहे त्या विषयी विचारले असता ते म्हणाले की, हा सत्तेचा दुरूपयोग आहे.
त्यांनी मलाही अशीच नोटीस देण्याचा प्रयत्न केला होता पण त्यांनीच नंतर ती मागे घेतली. ज्या पीएमसी बॅंकेच्या विषयावरून हा प्रकार सुरू आहे त्याच प्रकरणात मलाही नोटीस पाठवण्याचा प्रयत्न त्यांनी केला, पण मी या बॅंकेचा सदस्यही नाही किंवा खातेदारही नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.