लखनौ – भारतीय जनता पक्षाच्या तळातील कार्यकर्त्यांचाही कृषी कायद्यांना विरोध असून हे कायदे रद्द करावेत अशी त्यांचीही मागणी आहे, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. या नवीन कृषी कायद्यांना ग्राम पातळीवर जो विरोध होतो आहे तो झेलणे भाजपच्या कार्यकर्त्यांना अवघड जात आहे. त्यामुळे त्यांना हे कायदे नको आहेत असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी म्हटले आहे की, आपल्या काही श्रीमंत मित्रांना लाभ पोहोचवण्यासाठी मोदी सरकार शेतकऱ्यांना फसवू शकत नाही.आज जी शेतकऱ्यांबरोबर अंतिम बोलणी होणार आहेत त्यात सरकारने थेट हे कायदे मागे घेण्याची घोषणा केली पाहिजे.
आज भाजपच्याच कार्यकर्त्यांना हे कायदे नको आहेत ही वस्तुस्थितीही त्यांनी लक्षात घेतली पाहिजे, असेही अखिलेश यादव यांनी म्हटले आहे. या कायद्यांविषयी सामान्य शेतकरी आणि जनतेमध्ये जो असंतोष आहे त्याला सामोरे जाण्याचे धैर्य भाजप कार्यकर्त्यांमध्येही नाही. त्यामुळे सरकारने हे कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही त्यांनी केली आहे.