नवी दिल्ली – केंद्र सरकारने प्रवासी वाहनात चालकाशेजारी बसलेल्या प्रवाशासाठी एअरबॅग बंधनकारक करण्याचा प्रस्ताव चर्चेसाठी पुढे केला आहे. यामुळे प्रवाशांची सुरक्षितता वाढेल, असे सरकारचे म्हणणे आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाने या संदर्भातील मसुदा अधिसूचना जारी केली आहे. हा नियम नव्या मॉडेलसाठी एक एप्रिल 2021 पासून तर जुन्या मॉडेलसाठी एक जून 2021 पासून लागू करण्याचा सरकारचा विचार आहे.
रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या वेबसाईटवर या संदर्भातील माहिती देण्यात आली असून 30 दिवसाच्या आत सर्व संबंधितांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे. भारतात रस्ते अपघातात मोठ्या प्रमाणात मनुष्यहाणी होते.
ही अपघातांची संख्या कमी करण्यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालय प्रयत्न करीत आहे. त्यासाठी रस्त्याचा दर्जा वाढविण्यासाठी आणि वाहनांत सुरक्षित व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे सांगण्यात आले.