पुणे – जिल्ह्यातील आठ प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांचे जिल्हा परिषदेकडून खासगीकरण करण्याचे प्रस्तावित केले होते. त्याला जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता या नळ पाणी पुरवठा योजनांची वसुलीही ठेकेदारांकडून केली जाणार आहे.
सर्व साधारण सभेने मंजुरी दिल्यानंतर यासाठी आचारसंहितेनंतर निविदा प्रक्रिया राबविण्याची शक्यता आहे. खासगी ठेकेदारांकडून या योजना यापुढे चालवल्या जाणार आहेत. दरम्यान, विविध तालुक्यांमध्ये 1999 पासून सुरू असलेल्या योजनांचा यामध्ये समावेश आहे. योजनेत जिल्ह्यातील 167 गावे आणि वाड्यावस्त्या आहेत.
ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या आराखड्यानुसार खासगी तत्त्वावर देण्यात येणाऱ्यांकडून पाणी पट्टी वसूल केली जाईल. त्यानंतर ती सर्व रक्कम जिल्हा परिषदेला जमा करण्यात येईल. जेवढी रक्कम वसूल केली त्या तुलनेत ठेकेदारांना पैसे देण्यात येणार आहेत.
आठ योजनांमध्ये मावळ तालुक्यातील पाटण, मुळशी, पुरंदरमधील शिवरी, बारामती तालुक्यातील मोरगाव, आंबेगावमधील पोखरी, मावळमधील कार्ला, आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर आणि जुन्नरमधील बेल्हे यांचा समावेश आहे.