औरंगाबाद – प्रत्येक राज्यात केंद्रीय उत्कृष्टता केंद्र उघडण्याचे धोरण आहे. सर्वत्र सर्व क्रीडा प्रकारांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी काही राज्यांनी त्या क्षेत्रात प्रावीण्य मिळविण्यासाठी विशेष लक्ष केंद्रित करावे, असे धोरण आखण्यात आले. यामध्ये सर्वाधिक सात क्रीडा प्रकारांना औरंगाबादच्या केंद्रासाठी मान्यता देण्यात आली, अशी माहिती केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री किरेन रिजीजू यांनी केली.
औरंगाबाद येथे अत्याधुनिक जलतरण तलाव, टर्फ हॉकी मैदानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय क्रीडा प्राधिकरणातील औरंगाबाद येथील केंद्रासाठी पाच कोटी रुपयांचा निधी दिला जाईल. येत्या काळात क्रीडा पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याच्या मागणीचाही सकारात्मक विचार करू असे ते म्हणाले.
भारतीय परंपरेत अनेक प्रकारचे क्रीडा प्रकार आहेत. पण खेळांना जगण्याचे स्थान देण्याइतपत आपण त्याचे महत्त्व वाढवू शकलो नाही. परिणामी आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू घडविण्यासाठी लागणारी जिद्द कमी पडल्याचे दिसून येत असल्याने खेलो इंडियाच्या माध्यमातून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहे.
मल्लखांब आणि योगासन हे “खेलो इंडिया’चा भाग असतील असे केंद्राने नुकतेच जाहीर केले आहे. या खेळांना आता शिष्यवृत्ती मिळण्यास सुरुवात होईल. तसेच ऑलिम्पिक स्पर्धेत कबड्डीचाही समावेश करण्यात यावा यासाठी भारत प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.