मुंबई –आयपीएल स्पर्धेच्या पुढील मोसमात दोन नवे संघ घेण्याबाबत तसेच खेळाडूंचा लिलाव पूर्वीप्रमाणे मोठ्या पद्धतीने करण्यावरून आता बीसीसीआयमध्येच गटबाजी सुरू असल्याचे सांगितले जात आहे. दोन नव्या संघाच्या समावेशाबाबत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शहा यांच्यासह काही वरिष्ठ सदस्यही अनुकूल आहेत. मात्र, काही सदस्य संघसंख्या वाढवण्याच्या विरोधात आहेत.
दोन नव्या संघांचा समावेश करण्यासाठी खूप कमी कालावधी आहे. एवढ्या कमी वेळेत निविदा, खेळाडूंचा लिलाव आदी गोष्टी शक्य नाही. संघाच्या संबंधित सर्व स्टेक होल्डरला एवढ्या कमी वेळेत एकत्र आणि एका व्यासपीठावर आणणे कठीण आहे. त्यामुळे 2022 साली होत असलेल्या
स्पर्धेसाठी दोन नवे संघ घेण्याचा निर्णय घेतला तर त्याला विरोध होणार नाही.
ब्रॉडकास्ट करार आयपीएल 2021 नंतर संपत असून 2021 सालच्या स्पर्धेत संघ वाढ केली तर बीसीसीआयला नवे प्रायोजक तसेच थेट प्रक्षेपण करणारी वाहिनी वाढीव रक्कम देणार नाही. मात्र, व्यवस्थित योजना तयार करून दोन वर्षांनी संघांच्या संख्येत वाढ केली तर या सर्व अडचणी दूर होतील, असे बीसीसीआयच्या एका सदस्याने सांगितले आहे.
8 ऐवजी 10 संघ झाल्यास सामन्यांची संख्याही 94 पर्यंत वाढेल. त्याचा परिणाम जगभरातील अनेक मालिकांवर होईल. अनेक देशांना त्यांच्या क्रिकेट सामन्यांच्या वेळापत्रकातही मोठा बदल करावा लागेल. 2021 सालच्या स्पर्धेला केवळ 4 महिने बाकी असून इतक्या कमी वेळेत या सर्व अडचणी दूर होणे शक्य नाही. मात्र, दोन वर्षे थांबले तर संघ संख्याही वाढेल व करार आणि प्रायोजकता यांसह खेळाडूंचा लिलावही मोठ्या प्रमाणावर करता येईल, असेही या सदस्याने सांगितले. बीसीसीआयची विशेष बैठक आज होत आहे. या बैठकीत आयपीएलमधील नव्या संघांबाबत निर्णय घेतला जाणार आहे. बैठकीत नव्या संघाचा निर्णय निश्चित झाला तर एक संघ अहमदाबाद असेल. त्याबरोबर दुसरा संघ लखनौ किंवा कानपूर असेल. पुणेदेखील शर्यतीत आहे.
पुढील स्पर्धेसाठी मिनी लिलाव
आयपीएल स्पर्धेच्या पुढील वर्षीच्या मोसमात दोन नवीन संघांचा समावेश होण्याची शक्यता नसल्याचे जरी बीसीसाआय सांगत असली तरीही त्यासाठी पडद्यामागून प्रयत्न सुरू असल्याचे संकेत मिळत आहेत. मुख्य प्रायोजकाची निश्चिती, प्रक्षेपण हक्कांची निविदा प्रक्रिया तसेच खेळाडूंचा लिलाव आदींसाठी वेळ खूपच कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, पुढील वर्षी होत असलेल्या स्पर्धेसाठी पूर्वीप्रमाणे मोठ्या प्रमाणावर लिलाव होणार नसून मिनी लिलाव होणार असल्याचे सांगितले जात आहे. आज बीसीसीआयची सर्वसाधारण सभा होत असून त्यातच याबाबतचे सर्व निर्णय घेतले जातील, असेही सांगण्यात आले आहे.
बीसीसीआय मोठा लिलाव करण्याच्या विचारात नसून पुढील वर्षी मिनी लिलाव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर लिलावाची तारीख ठरवण्यात येणार आहे. मात्र, हा लिलाव फेब्रुवारीत होणार असल्याचेही सांगितले जात आहे. करोनानंतर भारतामध्ये पहिल्यांदाच सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा 10 ते 31 जानेवारी या कालावधीमध्ये खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी खेळाडूंना स्पर्धेच्या ठिकाणी 2 जानेवारीपर्यंत दाखल व्हावे लागणार आहे.
बीसीसीआयने स्पर्धेसाठी सहा केंद्रे बनवली आहेत, या केंद्रांमध्ये खेळाडूंना 2 जानेवारीपर्यंत पोहोचायचे असून त्यानंतर ही स्पर्धा सुरू करण्यात येणार आहे. बीसीसीआयने सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धा प्रथम खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. पण अद्याप रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेबाबत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. या स्पर्धेच्या आयोजनानंतर रणजी करडंक क्रिकेट स्पर्धेच्या आयोजनाचा विचार केला जाऊ शकतो.