-अरुण गोडबोले
आपल्या सर्वांनाच नेहमी असे वाटत असते की, आपले जीवन हे सुखी, समाधानी आणि आनंदाने भरलेले असावे. पण वास्तवात मात्र तसे होत नाही. ह्या जगात सर्व सुखी असा कोणीच नाही. प्रत्येकाच्या जीवनाला कुठली ना कुठली तरी सुखदु:खाची किनार ही असतेच. समर्थ रामदास तर मानवी मनाला ह्या सत्याची खरी जाणीव करून देताना म्हणतात- जगी सर्व सुखी असा कोण आहे? विचारी मना तूच शोधून पाहे।।
हा शोध ज्याने त्याने आपला आपणच घ्यायचा आहे. कारण सत्य हेच आहे की जीवनात दु:खाचे पर्वत आणि सुख हे राईच्या कणासारखे आहे. त्यामुळेच सुख हे आपल्याला जसे देवदेवतांनी समुद्रमंथन करून अमृत मिळवले. तसे विचाराच्या रवीने जीवनाची विवेकी घुसळण करून मिळवायला लागते. छोट्या छोट्या गोष्टीत सुख दडलेलं असतं. ते शोधायला, ओळखायला लागते.
जीवनाची खरी ओळख हीच आहे की, इथे कोणी राजा असो वा रंक, गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा मोठा प्रत्येकालाच काहीना काही तरी सुखदु:ख हे असतेच आणि ते असणारच. आपण इथे जो विवेक, जो विचार करायचा असतो तो ह्याचा की माझ्याकडे काय आहे ह्याने सुखी राहायचे का नाही म्हणून रडत बसायचे?
इथे हाच विवेक राखावा लागतो की सुख काय किंवा दु:ख काय हे कधीच फार काळासाठी नसते. त्यात कमी जास्त बदल, चढउतार हे होतातच. कारण जीवनाचा दुसरा अर्थ आहे पाणी. पाणी हे जर खळखळत राहिले नाही तर ते पाणीच नाही. सुख हे शोधण्याची एक कला आहे ती साधायला हवी. हाताला काटा टोचला म्हणून दु:ख मानायचे का, त्या काटेरी फांदेवरचेच सुंदरसे गुलाबाचे फूल हाती मिळालं, म्हणून आनंद मानायचा हे ज्याने त्याने विवेकानेच ठरवायचे असते. सुख, समाधान, आनंद हे घेण्यात नाही तर तो देण्यात आहे. देण्यातले सुख आणि दु:खातले सुख हे कसे अनुभवावे हे शिकावे लागते.
हे अनुभवून पाहावे लागते. सुख हे मानण्यात आहे. समाधानात आहे. सुखाचा शोध हा बाहेर नाही तर तो आत घ्यायचा आहे. जे नाही त्याची खंत न करता जे आहे, त्यात समाधान मानणे हेच खरं सुख आहे.
सुखाचा शोध घेण्यासाठी अनेक जण घराबाहेर पडल्याची उदाहरणे आहेत. मात्र सर्वांना सुखाचा शोध हा त्यांच्याच अंतर्आत्म्यात लागला. जे आहे त्यात सुखी समाधानी राहले तर कुणालाही सुखाच्या शोधासाठी इतरत्र भटकावे लागणार नाही. सुख हे शोधून सापडणारी वस्तू नाही.
उलट सुख हे तुमच्यापाशी चालत येते. ते आपण सुख मानतो की नाही, यावर अवलंबून असते. एखाद्याकडे छोटे घर असेल तर त्याने त्यातच आपले सुख मानले पाहिजे, तो जर दुसऱ्यांच्या मोठ्या घराकडे पाहून दुःखी झाला तर त्याला स्वतःच्या घराचाही आनंद उपभोगता येणार नाही. कारण अनेक बेघर असलेल्या लोकांकडे स्वतःचे छोटे घरही नसते.