ऍडलेड –विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पहिल्या कसोटीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. आता कोहली मायदेशी परतत असल्याने मालिकेतील उर्वरित तीनही कसोटीत अजिंक्य रहाणेकडे नेतृत्वाची धुरा आहे. दारुण पराभवातून बाहेर येत संघाला यश मिळवून देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
कोहलीची उर्वरित कसोटी मालिकेतील माघार यामुळे रहाणेवर मोठी जबाबदारी आली आहे. येत्या 26 डिसेंबरपासून सुरू होत असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीपासून रहाणेच्या नेतृत्वाचीही कसोटी
लागणार आहे.
विक्रमादित्य सुनील गावसकर, इयान चॅपेल यांनी रहाणेच्या नेतृत्व कौशल्याचे कौतुक केले असून कसोटी मालिकेपूर्वी झालेल्या दोन्ही सराव सामन्यातदेखील रहाणेने कर्णधार म्हणून यश मिळवले आहे. आता त्याच्या कसोटीतील कर्णधारपदाचे आव्हान तो कसे सांभाळेल यावरच संघाचेही यशापयश अवलंबून आहे. 2015 साली झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी तसेच कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे रहाणेला प्रथमच भारताचे नेतृत्व करण्याची संधी लाभली होती.
रहाणेच्या नेतृत्वाखाली भारताने मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. तर दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारताने 1-1 अशी बरोबरी केली. त्यानंतर 2017 मध्ये धर्मशाला येथील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीपूर्वी कोहलीच्या खांद्याला दुखापत झाल्यामुळे रहाणेकडे भारताच्या कसोटी संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले.
रहाणेने या लढतीत कुलदीप यादवला खेळवण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि कुलदीपच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी नांगी टाकली. अफगाणिस्तानविरुद्ध 2018 मध्ये झालेल्या एकमेव कसोटीसाठी कोहलीला विश्रांती देण्यात आल्यामुळे नेतृत्वाची धुरा पुन्हा रहाणेच्या खांद्यावर सोपवण्यात आली. या कसोटीत भारताने अफगाणिस्तानवर सहज विजय मिळवला. या मालिकेत रहाणे कशी कामगिरी करतो याकडे नजरा लागलेल्या आहेत.